Raj Thackeray : मशिदीवरील भोंगे उतरवा, अन्यथा...

आमदारांना फुकट घरे द्या आणि त्यांची फार्म हाऊस ताब्यात घ्या - राज ठाकरे
Raj Thackeray
Raj Thackeray SaamTvNews

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) गुढीपाडवा मेळावा कोरोना पश्चात गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज शिवाजी पार्कवर पार पडत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडत असून या मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरेंनी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसून येतेय. या मेळाव्यासाठी राज्यभरातून मनसैनिक उपस्थित राहिले असून शिवाजी पार्कवर (Shivaji Park) ७० हजारांहून अधिक आसन व्यवस्थेसह इतर सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. (Raj Thackeray Live On Shivaji Park)

यावेळी मेळाव्यास संबोधित करताना राज ठाकरे यांनी उपस्थितांस गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातून आलेल्या सर्व मनसैनिकांना पाहून अभिमान वाटत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. कोरोना आणि लॉकडाऊनचा काळ आठवला कि थोडं बरंही वाटत आणि त्रासही होतो. गेले दोन वर्ष गुढीपाडवा मेळावा घेता आला नाही. मात्र, कोरोना काळात कशाचीही पर्वा न करता पोलिसांनी ज्यापद्धतीने अहोरात्र सेवा केली त्याबद्दल पोलिसांचे आभार आणि पोलिसांचा अभिमानही वाटतो. समाजात आलेले नैराश्य आणि आळस झटकून आता सर्वजण कामाला लागले आहेत. असे राज ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका

सध्या लॉकडाऊनचा कालावधी आणि कोरोना सगळं आपण विस्मरणात गेलो आहोत. त्याचप्रमाणे २ वर्षातल्या अनेक गोष्टी आपल्या विस्मरणात गेल्या आहेत. मात्र, त्या गोष्टींची पुन्हा आपल्याला आठवण करून देईल अथवा फ्लॅशबॅक करून देतो असे म्हणत राज ठाकरेंनी दोन वर्षात झालेल्या राजकारणाची मालिका वाचून दाखवायला सुरुवात केली. २०१९ साली उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाबाबत साक्षात्कार झाला आणि अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाबाबत उद्धव ठाकरेंनी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी खाजगीत बोलल्याची बाब समोर आणून राज्यात राजकारण फिरलं, असं म्हणत राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला.

मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरेंना अचानक साक्षात्कार -

२०१९ विधानसभा निकाल लागल्यानंतर उध्दव ठाकरेंना साक्षात्कार झाला अडीच अडीच वर्ष ठरली होती, पण या अगोदर याबाबत उद्धव ठाकरेंनी कधी सांगितले नव्हते. त्यांच्या व्यासपीठावर कधी बोलला नाहीत. पण जसा निकाल लागला तेव्हा तुम्ही म्हटला त्या अडी वर्षाचे काय झाले. मुख्यमंत्री पद राज्याचं आहे मग तुम्ही चर्चा चार भिंतीत का केलीत असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस-अजित पवार शपथविधीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, आपण सगळे सकाळी उठलो पाहतो तर काय जोडा वेगळाच होता. पळून कोणासोबत गेले आणि लग्न कोणासोबत केलं, हे महाराष्ट्राला समजेनाचं, असा टोला नाव न घेता राज ठाकरे यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

मंत्री जेलमध्ये जातायत, महाराष्ट्रात चाललंय काय?

राज ठाकरेंनी यावेळी राज्यातील अनेक नेत्यांवर जोरदार टीका केली. सचिन वाझे शिवसेनेत होता. त्यानेच अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवला. एवढ्या मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर बॉम्ब ठेवले जातात, त्याच उत्तर अजूनही महाराष्ट्राला मिळाले नसून बॉम्ब ठेवण्याची हिम्मत होतेच कशी असे राज ठाकरे म्हणाले. १०० कोटी मागितले म्हणून आमचा गृहमंत्री जेलमध्ये जातो, दहशतवाद्यांशी संबंध असलेला मंत्री जेलमध्ये जातो महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित करत अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. १९९९ साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला तेव्हापासूनच महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरु झाली. राष्ट्रवादीच्या जन्मापूर्वी जात अभिमान म्हणून मिरवली जात होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापनेपासूनच दुसऱ्या जातीबद्दल द्वेष पसरवण्याचे काम केले अशी घणाघाती टीका राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसवर केली.

बाबासाहेब पुरंदरेंना टार्गेट केलं गेलं

बाबासाहेब पुरंदरेंना त्यांच्या ब्राह्मण जातीवरून टार्गेट केलं गेलं. बाबासाहेब पुरंदरे हे या लोकांचं सॉफ्ट टार्गेट होते. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली तो महाराष्ट्र आज जाती पातींमध्ये अडकून पडला असून याचे वाईट वाटत आहे. आपण जातीपातींमध्ये अडकून राहणार असू तर कसलं हिंदुत्व; त्यामुळे जातीपातींमधून बाहेर या तरच हिंदुत्वाचा ध्वज हाती घेता येईल. जनता सगळं विसरतेय याचाच फायदा घेतला जात असल्याचे देखील राज ठाकरे म्हणाले.

मशिदीवरील भोंग्याबाबत राज ठाकरे आक्रमक :

मशिदीवरचे भोंगे खाली उतरवावे लागतील, मी धर्मांध नसून धर्माभिमानी असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला. जर सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम केले नाही तर आम्ही त्या मशिदींसमोर मोठमोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com