
पुणे : यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पात एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा आहे. या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी या गेम चेंजर प्रकल्पाविषयी माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार बाळा भेगडेयांच्यासहित इतर नेते मंडळी आणि अधिकारी होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई- पुणे या महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे हे अंतर कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. महामार्गावरील घाट असलेला भाग या प्रकल्पामुळे टाळता येणार आहे. या घाटमार्गामुळे होणारा वाहतूक अडथळा दूर होणार आहे. मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या महामार्गावर आरामदायी प्रवास होणार आहे'.
'मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत एकूण तीन बोगदे आहेत. एक बोगदा ९ किलोमीटर लांब, २३ मीटर रुंदीचा आहे. हा देशातील सर्वात जास्त लांबीचा बोगदा ठरणार आहे. या आधी समृद्धी महामार्गावरील बोगद्याचा विक्रम या बोगद्यामुळे मागे पडणार आहे. या प्रकल्पांतर्गत अतिशय उंच पूल बांधण्यात येत आहेत. याची उंची १८५ मीटर आहे. देशामध्ये आत्तापर्यंत एवढा उंच पूल कुठल्याच ठिकाणी बांधला गेलेला नाही. हा देखील एक विक्रम होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
'या प्रकल्पाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या प्रकल्पाचे एकूण ९४ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रतिकूल परिस्थितीत प्रकल्पाचे काम करणारे अभियंते आणि कामगारांचे कौतुक केले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मिसिंग लिंक प्रकल्प हा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येतोय. हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे. येथील वातावरण आणि हवेच्या दाबाची स्थिती पाहता अतिशय कठीण परिस्थितीमध्ये अनेक अभियंते काम करत आहेत. मिसिंग लिंक हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास अर्ध्या तासाने कमी होणार आहे. या घाट भागातील वाहतुकीची समस्या पूर्णपणे सुटण्यास आणि अपघात टाळण्यास मदत होणार आहे'.
'महामार्गावरील या प्रकल्पामुळे वेळेसोबत इंधनाचीही बचत होईल, प्रदूषणही कमी होईल. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळणार आहे. या सर्वसामान्य नागरिकांना आणि राज्यातल्या जनतेला हा प्रकल्प दिलासादायक ठरेल, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.