पावसाळ्यात इमारत कोसळून अपघात होऊ नये म्हणून म्हाडा दरवर्षी आपल्या इमारतींचे सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. मात्र यंदा पावसाळा तोंडावर आलेला असतानाही म्हाडाने अद्याप सर्वेक्षण करून आपल्या धोकादायक इमारतींची यादीच तयार केलेली नाही. त्यामुळे कोणत्या इमारती धोकादायक आहेत, खाली करायच्या की नाही याबाबत रहिवाशांमध्ये संभ्रम असून धोकादायक इमारती कधी जाहीर होणार असा सवाल रहिवाशी करत आहेत.
म्हाडाच्या मुंबईत जवळपास १४ हजारहून अधिक उपकरप्राप्त इमारती आहेत पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून अपघात होऊन जिवित-वित्त हानी होऊ नये म्हणून म्हाडा पावसाळ्यापूर्वी दरवर्षी मार्च - एप्रिलमध्ये म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळातर्फे मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचे सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. मात्र, पावसाळा तोंडावर येऊनही म्हाडाने यंदा अद्याप धोकादायक इमारतींची यादी जाहीर झालेली नसल्यामुळे पावसाळ्यात धोकादायक इमारतीत रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागणार असल्याचे दिसत आहे. तसेच म्हाडानेच अद्याप धोकादायक इमारती निश्चित केलेल्या नाहीत. त्यामुळे आपण राहत असल्याची इमारत धोकादायक आहे का अशी चिंता रहिवाशांना सतावत आहे.
म्हाडाच्या सर्वेक्षणात अतिधोकादायक इमारत असल्याचे स्पष्ट झाल्यास ती तत्काळ रिकामी करून रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतर केले जाते. मात्र, पावसाळा तोंडावर येऊनही अद्याप धोकादायक इमारतींची यादी जाहीर झाली नसल्यामुळे पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार असा सवाल विश्वास रेडीज या रहिवाशाने केला आहे.
लोकसभा निवडणूकीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून म्हाडाचे बहुतांश कर्मचारी निवडणूक कामात गुंतले आहेत. त्यामुळे धोकादायक इमारतींच्या कामाला विलंब झाला असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकार-याने दिली. तसेच आठवडाभरात सर्व जुन्या इमारतींचे सर्वक्षण करून धोकादायक इमारतींची यादी जाहीर केले जाईल असेही त्यांनी सांगितले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.