
विधानसभेचं उद्यापासून अर्थसंकल्प अधिवेशन होत आहे. अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. महायुतीच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध विषयावर मते मांडली. अधिवेशनात विरोधाला विरोध होत असेल तर, त्याला किती महत्व द्यायचं हे ठरवलं जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, 'विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहोत. राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना चहापानासाठी बोलावलं. मात्र, विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला'.
'वास्तविक सरकार नवीन येत असतात. जनतेच्या मनात असेल तर बदल करत असते. चांगलं काम केल तर जनता सरकारला पुन्हा संधी देत असते. आम्हाला प्रचंड बहुमत मिळालंय. आमचं सरकार चांगलं चालावं. आमचं काम व्यवस्थित चालू आहे. आम्हाला विरोधकांशी चर्चा करायची होती. मात्र, विरोधकांनी भलंमोठं पत्र सरकारला दिलंय. आमची विरोधकांशी चर्चा करायची तयारी आहे, असे अजित पवार यांनी सांगितलं.
'आमचं २३८ आमदारांचं बहुमत आहे. विरोधी पक्षाकडे फक्त ५० आमदार आहेत. आम्ही बहुमताच्या जोरावर कामकाज रेटणार नाही. आम्ही चार आठवड्यांचं अधिवेशन ठेवलं आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशी अधिवेशन ठेवून पुण्यश्री अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आहे. आम्ही त्यांच्याविषयी चर्चा ठेवली आहे. अशा प्रकारे महायुतीचं सरकार प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याच्या तयारीत आहे, असे पवार पुढे म्हणाले.
'विरोधकांच्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर उत्तर देऊ. कारण नसताना विरोधाला विरोध होत असेल तर, त्याला किती महत्व द्यायचं हे त्यानुसार ठरवलं जाईल. असं साधारण अधिवेशन चालवलं जाईल. जी बिले येतील, त्यावर चर्चा होईल. त्यावर साधक बाधक चर्चा होईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.