खार-सांताक्रूझ परिसरातील सुमारे १४० इमारतींना खार सब-वे उड्डाणपुलामुळे बाधा पोचणार असल्याने स्थानिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यांनी पालिकेने हा पूल रद्द करावा, अशी मागणी केली आहे. शिवाय पूल रद्द न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
पालिकेच्या खार सब-वे उड्डाणपूल प्रकल्पामुळे १४० इमारती बाधित होणार आहेत. या गर्दीच्या भुयारी मार्गावरील उन्नत मार्गाला विरोध होत आहे. वांद्रे पूर्वेच्या गोळीबार भागामधून एक पूल बांधण्यात येणार आहे. हा पूल असताना दुसरा पूल कशाला, असा सवाल स्थानिक करीत आहेत. हा पूल खार आणि सांताक्रूझ येथील इमारतींच्या अगदी जवळून जाणार आहेत. इमारती आणि पूल यातील अंतर फूटभरही नाही. त्यामुळे इमारतींना धोका उद्भवू शकतो. त्यामुळे हा पूल रद्द करावा, अशी मागणी स्थानिक करीत आहेत.
संबंधित परिसरातील रहिवासी असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही धाव घेतली असून त्यांना हा पूल होऊ नये, यासाठी निवेदन दिले आहे. पालिकेकडेही पाठपुरावा केला आहे; मात्र अद्याप त्याबाबत काही निर्णय झाला नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पुलाचा १,१०० कोटींचा खर्च वाढत चालला असून २,४०० कोटींच्या निविदांना स्थगिती द्या, डिझाईनमध्ये काही बदल करा, अशी मागणी इमारतींतील नागरिकांनी पालिकेकडे केली आहे.
उड्डाणपुलामुळे येथील इमारतींना बाधा होणार आहे. येथील रहिवासी करदाते आहेत. त्यांना विश्वासात घेऊन पूल बांधण्यात येत नसल्याने असंतोष निर्माण झाला आहे. लोकभावनेचा आदर करून पूल रद्द करावा, अशी मागणी मुंबई महापालिका माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.