गणेश कवडे, साम टीव्ही प्रतिनिधी
डोंबिवली : डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये भीषण स्फोटानंतर तीन कंपनीला आग लागली. या भीषण स्फोट आणि आगीने परिसरात हादरून गेला आहे. या स्फोटामुळे कामगार आणि नागरिकांना मोठा फटका बसला आहे. या घटनेतील जखमींना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण आगीवर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'डोंबिवलीतील आग गंभीर असून चौकशी करून कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे.
मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले, 'डोंबिवली एमआयडीसी फेज-2 मध्ये केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय गंभीर आहे. या स्फोटामुळे जखमी झालेल्या रुग्णांवर होणाऱ्या उपचारांना यश यावे, अशी प्रार्थना आहे. ही आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याबाबत प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
'या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी कृपया घाबरु नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन मंत्री चव्हाण यांनी केलं.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आगीवर प्रतिक्रिया दिली. 'सुरक्षेच्या संदर्भात सरकार गंभीर नाही. ड्रग्ज, रोड सेफ्टी असे दे कशातच सरकार गंभीर नाही. राज्यात दुष्काली स्थिती असून तरीसुद्धा लक्ष दिलं जात नाही. सरकार सुरक्षेकडे लक्ष देत नाही हे यातून दिसून येतंय'.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी डोंबिवली एमआयडीसी परिसरातील घटनास्थळी भेट दिली. यावर मंत्री उदय सामंत म्हणाले, 'या आगीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. डोंबिवली एमआयडीसी परिसरात धोकादायक केमिकल बनवणाऱ्या कंपन्या स्थलांतरित करण्याबाबत लवकरच निर्णय घेणार आहे. या कंपन्यांसाठी पर्यायी जागांचा शोध सुरु आहे'.
श्रीकांत शिंदे म्हणाले, 'अति धोकादायक केमिकल बनवणाऱ्या कंपन्यांना शहराबाहेर स्थलांतरित करण्यात यावे, याबाबत मागणी करणार आहे. ज्या कंपन्यांमध्ये अतिशय धोकादायक केमिकल बनवले जातात, अशा कंपन्यांना शहराबाहेर वर्गीकरण करून पाठवण्याच्या निर्णय घेणार आहे'.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.