

राज्य सरकारकडून ४ धडाडीचे निर्णय
शिक्षकांचे वेतन, आयटीपार्कविषयी सरकारकडून महत्वाचा निर्णय
शेतजमिनीबाबत निर्णय घेत शेतकऱ्यांना देखील दिलासा दिला आहे
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बुधवारी बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयामध्ये शिक्षकांचे वेतन, आयटीपार्कविषयी धाडसी निर्णय घेण्यात आले. त्याचबरोबर कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरणातही बदलाचे संकेत सरकारने दिले आहेत. या धोरणासाठी कोट्यवधींची तरतूद केली.
फडणवीस सरकारने आज बुधवारी ४ महत्वाचे निर्णय घेत हजारो नागरिकांना मोठा दिलासा आहे. या मंत्रिमंडळाच्या निर्णयात महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण जाहीर करण्यात आलं आहे. सरकारच्या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती, बायोगॅस प्रकल्प पीपीपी, हायब्रीड अन्युईटी तत्वावर राबवण्यात येणार आहे. यावर्षासाठी पाचशे कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. त्याचबरोबर घनकचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन, हरित गृह वायू उत्सर्जन कमी होणार आहे.
सरकारने ७ कॉलेजमधील शिक्षकांना दिलासा दिला आहे. राज्यातील सात आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन मिळणार आहे. या पदावरील शिक्षकांना उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या पद भरतीमध्ये अतिरिक्त गुण मिळणार आहे.
साताऱ्यात होणार नवीन आयटी पार्क
सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडीच्या आय. टी. पार्कला जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास ४२. ५५ हेक्टर जमीन देण्यात येणार आहे. सरकारच्या निर्णयाने सातारा जिल्हा आणि परिसरातील आयटी क्षेत्राला प्रोत्साहन, युवकांना रोजगार - व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
राज्यातील कमाल जमीन धारणा मर्यादा नियमानुसार भोगवटादार वर्ग – २ मधून भोगवटादार वर्ग – १ मध्ये रुपांतरणाच्या अधिमुल्याची पुनर्रचना करण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना काढण्यास मान्यता दिल्याचे सरकारने स्पष्ट केले.