
मुंबई : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता म्हणजे कोस्टल रोडचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण झालं. कोस्टल रोडमुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच इंधनामध्ये मोठी बचत होणार आहे. तसेच प्रदूषणापासून मुक्ती मिळण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई किनारी रस्त्याचे ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे. आज प्रजाकसत्ताक दिनी कोस्टल रोडचं उद्घाटन झाले आहे. प्रजासत्ताक दिनी हा मार्ग नागरिकांना समर्पित झाला आहे. २७ जानेवारीपासून हा कोस्टल रोडाच्या तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत. यामध्ये मरीन ड्राईव्हकडून प्रभादेवीकडे जाण्यासाठीची आंतरमार्गिका असेल. तसेच मरीन ड्राईव्हकडून बिंदूमाधव ठाकरे चौकाकडे जाणारी आंतरमार्गिका आहे. तसेच बिंदूमाधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका यांचा समावेश आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'प्रजाकसत्ताक दिनी कोस्टल रोडचं लोकार्पण होत आहे. या मार्गामुळे मुंबईकरांच्या जीवनात मोठा बदल घडेल. किनारी रस्त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तांत्रिक कामाचे उपमुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्त्याच्या दक्षिण या मार्गाचे लोकार्पण झालं. यामुळे मरीन ड्राइवकडून सागरी सेतूकडे जाणारी वाहतूक उत्तर वाहिनी पुलावरून सुरू होणार आहे.
मरीन ड्राईव्हकडून प्रभादेवीकडे जाण्यासाठी आंतरमार्गिका सुरू होणार आहे. मरीन ड्राईव्हकडून बिंदू माधव ठाकरे चौकाकडे जाणारी आंतरमार्गिका सुरू होणार आहे.
बिंदू माधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका देखील सुरू होणार आहे.
वाहतूक स्थिती : १२ मार्च २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ५० लाख वाहनांचा प्रवास तर दररोज सरासरी १८ ते २० हजार वाहनांचा प्रवास असणार आहे.
धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पामधील महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुंबई किनारा रस्ता प्रकल्प व वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणारा पुल आहे. या पुलाची एकूण लांबी ८२७ मीटर असून वजन २४०० मेट्रीक टन इतकी आहे.
कोस्टल रोड (दक्षिण) प्रकल्प शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे.
वेळेची सुमारे ७० टक्के बचत, तर इंधनात ३४ टक्के बचत आहे. याचे फलित म्हणून परकीय चलनाचीही बचत , ध्वनी प्रदूषण आणि वायुप्रदूषणात घट होण्यास मदत आहे. ७० हेक्टर हरित क्षेत्राची निर्मिती, मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना नवीन विहारक्षेत्र लाभणार आहे. या प्रकल्पात सागरी संरक्षण भिंतीची उभारणी. यामुळे किनाऱ्याची धूप होणार नाही. समुद्राच्या उंच लाटांपासून प्रकल्पाचे संरक्षण होईल.
बोगदा खनन संयंत्राच्या साहाय्याने भारतातील सर्वात मोठ्या व्यास (१२.१९ मीटर) असलेल्या बोगद्याची निर्मिती होत आहे. भारतात प्रथमच रस्ते वाहतूक बोगद्यांमध्ये सकार्डो वायूजीवन प्रणालीचा वापर होत आहे. भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ (मोनोपाईल) उभारून पुलाची बांधणी आहे. एकाच प्रकल्पामध्ये पुन:प्रापण करून रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग अच्छादित बोगदा, समुद्रक्षेत्र तसेच टेकडीखालून बोगदा, आरक्षणाची निर्मिती होत आहे. भारतात सर्वप्रथम समुद्रकिनारी भरती-ओहोटी क्षेत्राखालून बोगद्याचे खनन व बांधकाम होत आहे. या प्रकल्पात प्रवाळांच्या वसाहतींचे स्थलांतर ९० टक्के यशस्वी झाले आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च १३ हजार ९८३ कोटी इतका आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.