
मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसींमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हैदराबाद गॅझेटच्या जीआरमुळे ओबीसींनी नाराजी दर्शवली आहे. ओबीसी समुदायांनी राज्यात विविध भागातून सरकारच्या शासन निर्णयाचा विरोध दर्शवला. ओबीसींमध्ये मराठा समाज वाटेकरी झाल्यास आमचं वाटेचं आपोआपच कमी होईल, असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
'ब्लॅक अँड व्हाईट' या साम टीव्हीवरील विषेश कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावरून मोठं भाष्य केलं. मंत्री छगन भुजबळ म्हणाले, 'ओबीसीमध्ये लहान लहान घटक आहेत. भटक्या, विमुक्त असे घटक आहेत. त्यात एवढा मोठा समाज आला, तर तो कोणाच्यातरी वाट्याचं घेईलच. आमच्या वाटेच्या १० पैकी २ नोकऱ्या त्यांना जातीलच. आमचे वाटेकरी झाल्याने कमीच होणार आहे. आमच्या ताटात दोन भाकऱ्या होत्या. त्यात आणखी आल्याने आपोआपच कमी होणार आहे. मंडल आयोग लागू झाला. ९३ सालानंतर आयोग ठरवू लागले'.
भुजबळ म्हणाले, 'मराठा समाजाला सर्वांनी मागास म्हणून नाकारलं. एका गायकवाड आयोगाने काही गोष्टी मान्य केल्या. तेव्हा सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण गेलं. मराठा समाज हा आमच्यापेक्षा पुढारलेला आहे. आमच्यापेक्षा मागास दलित आहेत. ही संपूर्ण उतरंड आहे. शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या गरीब आहात. पण सामाजिकदृष्ट्या मराठा मागास नाहीत. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. झोपडपट्ट्यांमध्ये कोण राहतंय? त्या समाजाला सामाजिकदृष्ट्या वर उचलण्याचा प्रयत्न आहे'.
'सरकार वेगवेगळ्या मार्गातून मदत करत आहेत. आरक्षण मिळाल्याने नोकरी लागणार असल्याचं डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. दरवर्षी नोकऱ्या २-३ टक्के कमी होत आहेत. एआयमुळेही नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे. बीडला जाळपोळ झाली. तिकडे आमदारांचीही घरे जाळली. महाराष्ट्र स्तब्ध झाला होता. तेव्हा आम्ही जरांगेंच्या विरोधात बोलू लागलो, असे भुजबळ म्हणाले.
'मराठा समाजाने हैद्राबाद गॅझेटची मागणी केली होती. जे कुणबी आहेत. त्यांना आरक्षण द्या. त्याविषयी आमचं काहीच म्हणणं नाही. पण गॅझेटियरमध्ये ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांच्यासाठी विचार केला जातोय. काही वर्षांपूर्वी मराठ्यांचे लाखांमध्ये मोर्चे निघाले होते. गुजरातमध्ये पटेल, पाटीदरांचे मोर्चै निघाले. त्यावेळी ईडब्लू आरक्षणाची तरतूद आणली. जो समाज एससी एसटी, ओबीसीमध्ये बसत नाही. त्यांच्यासाठी ती सोय करण्यात आली होती. ईब्लूएस आरक्षण आल्यानंतर गुजरात, राजस्थानमधील मोर्चे थांबले. मराठा समाज एकटा आठ टक्के आरक्षणाचा लाभ घेत आहे. ओबीसीत ३७४ जाती आहेत. ते वाटून वाटून १७ टक्के राहिलं आहे. हे लोक आल्यानंतर कसं होणार. मेडिकलला मराठा आरक्षणात कट ऑफ कमी आहे. ईडब्लूएसमध्येही कट ऑफ कमी येतो. पण ओबीसीत कट ऑफ जास्त येतो, असेही छगन भुजबळांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.