अजय दुधाने, साम टीव्ही
वाढदिवसाच्या पार्टीत दारूवरून वाद झाल्याने तीन मित्रांनी बर्थडे बॉयलाच चौथ्या माळ्यावरून ढकलून देत त्याचा खून केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. कार्तिक वायाळ असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर (Ulhasnagar News) येथील चिंचपाडा परिसरात राहणारा कार्तिक वायाळ याचा २७ जून रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्त त्याने त्याचे मित्र निलेश क्षीरसागर, सागर काळे आणि धीरज यादव यांना पार्टी दिली. चिंचपाडा गावातील आर्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील निलेश क्षीरसागर याच्या फ्लॅटमध्ये ही पार्टी सुरू होती.
मात्र, या पार्टीत दारूवरून चौघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. वाद इतका विकोपाला गेला की, कार्तिक याने निलेशच्या डोक्यात दारूची बाटली (Crime News) फोडली. याचा राग आल्यामुळे निलेश, सागर आणि धीरज या तिघांनी कार्तिक याला चौथ्या मजल्यावरून थेट इमारती खाली ढकलून दिलं.
या घटनेत कार्तिकचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपींनी बनाव रचला. कार्तिकने निलेशच्या डोक्यात बाटली मारल्याने तो जखमी झाला आणि आम्ही त्याला रुग्णालयात घेऊन गेलो, तिथून परत आल्यानंतर कार्तिक हा मृतावस्थेत इमारतीच्या खाली आढळला, आरोपींनी कार्तिकच्या वडिलांना सांगितलं.
पण वडिलांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांत (Police) धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन खाक्या दाखवल्या असता, त्यांनी कार्तिकच्या हत्येची कबुली दिली. याप्रकरणी या सर्वांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.