
गेल्या पाच वर्षात बदलेली राजकीय समीकरणं पाहता महाराष्ट्रात कधीही काहीही घडू शकतं. त्यामुळेच आता पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजप पुन्हा एकत्र येण्याची चर्चा रंगू लागलीय. त्याला कारणही तसंच आहे. नागपूर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे विधानभवन परिसरात दाखल झाले. सर्वांना वाटलं की ते सर्वात आधी आपल्या मविआतल्या मित्र पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार. मात्र त्यांनी थेट कट्टर राजकीय शत्रू असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाची केबिन गाठली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
उद्धव ठाकरे दुपारी तीन वाजून १० मिनिटांनी फडणवीसांच्या कार्यालयात गेले. त्यांनी फडणवीसांचं फुलगुच्छ देऊन अभिनंदन केलं. त्यानंतर बंद दाराआड दोघांमध्ये ८ मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर ३ वाजून १८ मिनिटांनी उद्धव ठाकरे फडणवीसांच्या केबिनमधून बाहेर पडले. या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी सुसंस्कृत राजकारणाचा दाखल देत बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील सांगण्यास बगल दिली.
खातेवाटपावरून शिंदे गट नाराज आहे. त्यात अनेक दिवस शिंदे आणि फडणवीसांमध्ये संवाद तुटला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या फडणवीसांच्या या अचानक भेटीमुळे पुन्हा नवी समीकरणं जुळण्याबाबत चर्चा रंगली. आणि त्यामुळेच एकत्र येण्याची शक्यात फेटाळतानाच शेवटी राजकारण आहे काहीही होऊ शकतं असं सांगायला नाना पटोले विसरले नाहीत.
उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार अशी चर्चा यापूर्वीही रंगली आहे. मात्र यावेळी भाजप आणि शिंदे गटात खाते वाटपावरून टोकाचे संबंध ताणले गेले असून सारंकाही आलबेल नसल्याचं दिसतंय. त्यातच ऐन अधिवेशनात ठाकरेंनी सर्वात आधी भेट घेतली ती फडणवीसांची त्यामुळे भाजप आणि ठाकरे गट पुन्हा टाळी देणार का आणि राज्यात पुन्हा या पंचवार्षिक योजनेत नवी राजकीय समीकरणं पाहायला मिळणार का याबाबत महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.