

शिक्षण घ्यायचं, चांगली नोकरी मिळवायची. मोठं व्हायचं, त्यासाठी अभ्यास, परीक्षा अन् अहोरात्र कष्ट करायचे हे प्रत्येकाचं स्वप्न. १८ वर्षांच्या कार्तिकनंही असंच स्वप्न उराशी बाळगलं असावं. पण नियतीला ते मान्य नव्हतं. परीक्षेला जातानाच आक्रित घडलं. परीक्षेला निघालेल्या कार्तिकच्या दुचाकीला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकनं धडक दिली. त्यात कार्तिकचा मृत्यू झाला. त्यानं बघितलेली सगळी सगळी स्वप्ने एका क्षणात बेचिराख झाली.
कार्तिक दीपक भंडारी असं अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. श्रीरामपूरमध्ये हा दुर्दैवी अपघात घडला. ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकनं त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या कार्तिकला प्राण गमवावे लागले. बेलापूर येथील कार्तिक हा परीक्षेसाठी निघाला होता. वाटेतच त्याला मृत्यूनं गाठलं. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण बेलापूर गावावर शोककळा पसरली.
श्रीरामपूर येथील रेल्वे उड्डाणपुलावर अपघातांची मालिका सुरूच आहे. बेलापूर येथील विद्यार्थ्याला आज, गुरुवारी अपघातात प्राण गमवावे लागले. या घटनेमुळं परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील ऊस वाहतूक करणारी अवजड वाहने अपघाताला कारणीभूत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कार्तिक भंडारी हा दुचाकीवरून परीक्षेसाठी जात होता. श्रीरामपूर शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी कार्तिकला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. याच उड्डाणपुलावर मागील एका महिन्यात दोन व्यक्तींना अपघातात जीव गमवावा लागला आहे.
अपघातांत एकामागून एक बळी जात असताना स्थानिक प्रशासन उड्डाणपुलावरील धोकादायक वळणावर कोणतीही उपाययोजना करत नसल्याचा आरोप होत असून, नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. हा उड्डाणपूल आहे की मृत्यूचा सापळा असा प्रश्न श्रीरामपूरकर विचारत आहेत. त्यातच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे होणारे अपघात जीवघेणे ठरत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.