
नाशिक: गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याचे दिसत आहे. महानगर प्रमुख प्रवीण तिदमे आणि उपनेते अजय बोरस्ते यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अप्रत्यक्ष रणसंग्राम पाहायला मिळत आहे. त्यातच नाशिकमध्ये १४ तारखेला एकनाथ शिंदे यांची आभार सभा पार पडणार आहे. आता यावेळी उपमुख्यमंत्री यावर काही तोडगा काढणार का? हे बघणं महत्वाचे ठरेल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १४ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे आभार सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आज नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेनेची नियोजन बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्याचे शिक्षण मंत्री आणि शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
दादा भुसे यांनी यावेळी नाशिकमधील अंतर्गत वादावर प्रतिक्रिया दिली. 'नाशिकमध्ये शिवसेनेत गट तट नाही, कोणी कोणती जबाबदारी स्वीकारावी यासाठी कमिटी स्थापन करतोय.', असं म्हणत दादा भुसे यांनी अंतर्गत वादावर पडदा टाकला. तसंच, 'कुठलंही ऑपरेशन सांगून होत नाही. नाशिकमध्ये देखील छोटे मोठे ऑपरेशन होतील आणि या ऑपरेशनचे मुख्य डॉक्टर एकनाथ शिंदे आहेत असं म्हणत दादा भुसे यांनी पक्षात होणार्या आगामी इनकमिंगबद्दल माहिती दिली.
तसंच, 'विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून जे भरघोस यश मिळालं. त्यासाठी जनतेचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यामध्ये दौरा करत कार्यकर्त्यांसोबत जनेतेच आभार मानत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून १४ तारखेला नाशिकच्या जनतेचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे नाशिकला येत आहेत. यावेळी शिवसैनिक उपमुख्यमंत्र्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करतील आणि शिवसैनिकांना अशा कार्यक्रमांचा अनुभव आहे. ' असंही दादा भुसे यांनी सांगितले.
कमीतकमी २ हजार लोक आणले तरच महापालिका तिकिट मिळेल.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांना किमान दोन हजार लोकं आभार सभेसाठी आणण्याच्या सूचना मंत्री दादा भुसे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. सभेसाठी किमान दोन हजार लोकं आणले तरंच महापालिका तिकीट मिळेल, असा सज्जड दम भुसे यांनी पदाधिकार्यांना दिला.
भुजबळांच्या विधानावर भुसे यांची प्रतिक्रिया
हिमालयातील साधू संतांचा आपल्याला काय उपयोग? असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवात केले होते. भुजबळांच्या या वक्तव्यावर दादा भुसे यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. 'आपला देश हा साधू, संतांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण करत असतो. त्यांचे मार्गदर्शन समाजासाठी महत्वाचे असते. तसेच आपल्या राज्याला आणि देशाला साधू, संतांची परंपरा आहे. साधू, संत हे समाज सुधारण्याचे काम करतात त्यांच्यामुळे चांगले विचार आणि दिशा मिळते.', असं मत दादा भुसे यांनी मांडलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.