Sharad Pawar, Ajit Pawar meetings, Maharashtra politics update : राज ठाकरेंनी टाळीसाठी एक हात पुढे केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत एक हात पुढे केलाय. त्यामुळं दोघे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. दुसरीकडं शरद पवार आणि अजित पवार हे देखील एकत्र येणार असल्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. महिनाभरात या दोन्ही नेत्यांच्या चार भेटी झाल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही प्रादेशिक पक्ष फुटल्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय गणित काहीसं सोपं वाटत असलेल्या भाजपचं टेन्शन वाढल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना विभागल्याचा फायदा भाजपला झाला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले होते. दोन पक्ष फुटल्यामुळे मतांची विभागणी झाली, त्याचा थेट फायदा भाजपला झाल्याचे अनेक विश्लेषकांनी सांगितले. आता पवार-काका पुतणे एकत्र आले तर, त्याचा फटका भाजपला बसू शकतो, असं मानलं जातंय. त्याशिवाय ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतांचा टक्का त्यांच्याकडे फिरू शकतो, अशामध्ये भाजपच्या मतांचा टक्का घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून सावध पावले उचलली जातील, असे विश्लेषक सांगत आहेत.
शरद पवार हे राजकारणात कोणत्या क्षणी कोणती खेळी करू शकतात, याचा अंदाज महाराष्ट्रातील नेत्यांना कधीच लागत नाही. महिनाभरापासून अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये चार ते पाच वेळा भेटी झाल्या आहेत. सोमवारी पुण्यात साखर कारखान्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. याआधीही दोन्ही नेते तीन ते चार वेळा भेटले आहेत. पवार कुटुंब एकत्र व्हावे, ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा आहे. पण शरद पवार भाजपसोबत सत्तेत जाणार का? किंवा अजित पवार सत्ता सोडून काकांसोबत जाणार का? या प्रश्नांचं उत्तर मिळाल्यानंतरच महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा निश्चित होऊ शकेल.
अजित पवार यांच्या मुलाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला पवार कुटुंब उपस्थित होते. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही उपस्थिती दर्शवली होती. सुप्रिया सुळे यांनी शुभेच्छा दिल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. तर काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी अजित पवार यांचे आशीर्वाद घेतले होते. त्याशिवाय आज युगेंद्र पवार यांनी काकी सुनेत्रा पवार यांचे आशीर्वाद घेतले. युगेंद्र पवार यांनी विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आम्ही कुटुंब म्हणून एकत्रच आहोत, अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिली होती. त्यामुळे पवार कुटुंबाच्या एकत्र येण्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील दुरावा कमी होऊन जवळीक वाढल्याचे दिसतेय. पण यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचे दिसतेय. शिवसेनेच्या काही नेत्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा महायुतीमधील सुप्त संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे, त्यातच शरद पवार जर महायुतीमध्ये गेले, तर शिवसेनेचे महत्व कमी होईल. पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातील राजकारण कोणत्या वळणावर जातेय, याकडे देशाचे लक्ष लागलेय.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळेल. पुढील महिनाभरात महाराष्ट्राच्या राजकारणात काय होणार? याची चर्चा नक्कीच दिल्लीमध्ये सुरू असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.