मयुर राणे
राज्यात सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. अशात महाराष्ट्रात सकाळपासून ८ ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्यात. येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे मतदारांचा खोळंबा होत आहे. यावरून खासदार संजय राऊतांनी थेट भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.
ईव्हीएम मशीन बंद पडल्यानंतर मतदारांचा खोळंबा होत आहे. त्यामुळे काही मतदार कंटाळा करून मतदानाकडे पाठ फिरवत आहेत. मतदारांना असं करायला लावणं हे भाजपच्या षडयंत्राचा एक भाग असू शकतं, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.
संध्याकाळनंतर त्या बंद पडलेल्या ईव्हीएम मशीन चालू होतात. नंतर ज्यांना हवे आहे त्या लोकांच्या झुंडी तिथे उभ्या राहतात. सकाळी येणाऱ्या मतदारांना ना उमेद करणं हे या निवडणुकीच्या यंत्रणेतील मोदीकृत भाजपाचे षडयंत्र आहे, असंही राऊतांनी यावेळी म्हटलं आहे.
मोदींचा वचननामा म्हणजे फेक नामा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकेर गटाचा जाहीरनामा काल प्रसिद्ध झाला. या जाहिरनाम्यावरून शिंदे गट आणि भाजपने जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. या टीकेला देखील खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोदींनी गेल्या दहा वर्षात यू टर्न घेतले आहेत. त्यांचा वचननामा म्हणजे फेकनामा आहे, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय.
लोक ठरवतील यु टर्नचा विषय काय आहे. बेरोजगारांना रोजगार देणं गुजरातला पळवलेले उद्योग परत आणणं, महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य, दहशतवादावरती उपाययोजना अशा अनेक भूमिका ज्या वचनाम्यात घेतलेले आहेत त्याला विरोध आहे का?, असा सवाल राऊतांनी जाहिरनाम्यावर टीका करणाऱ्यांना केला आहे.
मोदींनी गेल्या दहा वर्षात यू टर्न घेतलेले आहेत. त्यांचा वचननामा म्हणजे फेक नामा आहे. आम्ही प्रथमच आमचा वचननामा तीन पक्ष एकत्र आल्यावर जाहीर केला. त्यामुळे यांना पोटदुखी आहे यांना हे सहन होत नाही, अशा शब्दांत राऊतांनी हल्लाबोल केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.