राज आणि उद्धव ठाकरे यांची आज नाशिकमध्ये पहिलीच संयुक्त सभा पार पडत असून, शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर ही सभा सध्या सुरू आहे. या ऐतिहासिक सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरुवातीलाच तपोवन परिसरातील झाडतोडीच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
राज ठाकरे म्हणाले की, तुमच्या पक्षात वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून बाहेरून आलेल्या लोकांना तिकीट दिली जातात. हा कार्यकर्त्यांचा अपमान नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी थेट भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरही टीका करत गिरीश महाजनांना झाडं तोडायची आहेत, लाकूडतोड्या बरा होता असा टोला लगावला.
राज ठाकरे पुढे म्हणाले, झाडं छाटायच्या आधी स्वतःच्या पक्षातले कार्यकर्ते छाटले. पक्षातील लोकांना बाहेर काढून बाहेरून झाडं म्हणजेच लोक आणली आणि ती आता पक्षात लावत आहेत. हे नेमकं कोणतं राजकारण सुरू आहे? असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
नाशिकच्या विकासावर बोलताना राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. 2017 साली फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतो अशी घोषणा केली. त्या घोषणेला नाशिककर भुलले आणि सत्ता दिली. पण दत्तक घेतल्यावर हा बाप परत फिरलाच नाही अशी टीका त्यांनी केली.
कुंभमेळ्याचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले, 2012 साली आम्ही सत्तेत असताना अत्यंत उत्तम कुंभमेळा झाला. एकही झाड कापलं गेलं नाही. मग आत्ता झाडं का कापली जात आहेत? अमेरिकेतही त्याचा सत्कार झाला होता. कुंभमेळा संपल्यानंतर साधू-संत घरी गेल्यावर ही जमीन त्यांच्या घशात घालायची आहे. हे सगळं आधीच ठरलेलं आहे, असा थेट आरोप करत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.