राज्यामध्ये सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांना परतीच्या पावसाने झोडपून काढलं आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. अशामध्ये अलिबागमध्ये अंगावर वीज पडून पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील दिवलांग गावामध्ये ही घटना घडली आहे. रघुनाथ म्हात्रे आणि हृषिकेश म्हात्रे असं मृत पिता-पुत्राचे नाव आहे. दिवलांग गावामध्ये राहणारे रघुनाथ आपल्या मुलासोबत शनिवारी सायंकाळच्या सुमारास शेत तळ्यावर गेले होते. त्याचठिकाणी अचानक दोघांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेमध्ये दोघेही गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ रघुनाथ आणि त्याचा मुलगा हृषिकेशला अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच दोघांना तपासून मृत घोषीत केले. घरातील कर्ता व्यक्ती आणि मुलाचा मृत्यू झाल्यामुळे म्हात्रे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
शनिवारी रात्री रघुनाथ आणि हृषिकेश यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. रविवारी सकाळी दोघांच्याही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांनी रविवारी सकाळी दिवलांग गावात जाऊन रघुनाथ यांची पत्नी आणि मुलाची भेट घेत त्यांचे सात्वन केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.