
रायगड : परिक्षा संपली आणि सुट्टया सुरु झाल्या म्हणून धरणावर फिरायला गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा रायगडमधील मोर्बे धरणात बुडून मृत्यू झाला आहे. अनिकेत भगत (रा. सुकापुर) असं मृत तरुणाचं नाव आहे. तो इंजिनीअरिंगला शिकत होता. परिक्षा संपली म्हणून तो आपल्या मित्रांसोबत खालापुर तालुक्यातील मोर्बे धरणावर फिरायला गेला होता. धरणाच्या पाण्यात पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं तो पाण्यात बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी खालापुर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरिक्षक विशाल पवार अधिक तपास करत आहेत.
विहिरीची कडा ढासळली; दोन शाळकरी मुले बुडाली
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात देखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुट्या असल्याने गावातील पाच-सहा मुले जवळच असलेल्या विहिरीत पोहण्यासाठी गेले होते. त्यांनी विहिरीत उड्या घेताच विहिरींच्या आजूबाजूला बांधलेल्या दगडाची कडा अचानक ढासळली. यामुळे विहिरीत पोहणारी मुले तेथेच अडकली. यातील काही जणांना बाहेर काढण्यात यश मिळाले असून बाकी दोन मुलांचे मृतदेह आत्ता सापडले आहेत. तब्बल ८ ते १० तासांच्या शोधमोहिमेनंतर दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले आहेत. ३० ते ४० फूट खोल विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने शोध मोहिमेला अडथळा निर्माण होत होता. आपल्या मुलांचा मृतदेह पाहिल्यावर कुटुंबाने एकच टाहो फोडला.
सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी येथे दत्ता शेळके यांच्या शेतात असलेल्या विहिरीत ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. भीमरत्न हरीशचंद्र राजगुरु (वय १४) आणि नैतिक सोमनाथ माने (वय १५) या दोन मुलांचे मृतदेह आता सापडले आहेत. एकजण मामाच्या गावावरून सुट्ट्या संपवून परीक्षेचा निकाल घेण्यासाठी गावी आला होता. तर दुसरा मुलगा आपल्या आत्याकडे शिक्षणासाठी राहत होता. आज शाळेचा निकाल असल्याने वडिलांनी त्याला निकाल घेण्यासाठी बोरामणी येथे बहिणीकडे पाठवले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.