सागर निकवाडे
नंदुरबार : यंदाच्या उन्हाळ्यात देखील पाणी टंचाईची समस्या जाणविण्याचे चित्र आतापासून दिसू लागले आहे. उन्हाळ्याची चाहूल लागण्यासोबतच नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात आतापासूनच धरण कोरडी पडलेली दिसून येत असून धरण व तलावात केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याचे चित्र आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ परिसरात फेब्रुवारी महिन्याच्या मध्यंतरात पाणी समस्या जाणवत असून या भागातील नागरिकांना पाण्यासाठी दूरवर जावे लागत आहे. यानंतर धडगाव तालुक्यात देखील पाणी समस्या भेडसावू लागली आहे. अर्थात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच नंदुरबार जिल्ह्यात जलसंकट पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे पाणी पातळी देखील खालावत चालली आहे.
धरणात केवळ १० टक्के पाणीसाठा
नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या सातपुडा पर्वत रांगेतील डोंगराळ भागांमध्ये असलेले धरण आणि तलाव आतापासूनच कोरडे पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. धडगाव आणि अक्कलकुवा सारख्या दुर्गम भागात असलेल्या तालुक्यात अनेक धरण आणि तलावांमध्ये फक्त दहा टक्के जलसाठा उपलब्ध असल्यामुळे या भागांमध्ये येणाऱ्या काही दिवसात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
नागरिकांना करावी लागणार भटकंती
धडगाव तालुक्यातील अनेक धरण आणि तलावात फक्त 10 टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने आतापासूनच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ या भागातील नागरिकांवर आली आहे. तर एप्रिल आणि मे या दोन महिन्यात तर समस्या अधिक गडद होण्याचे चिन्ह आहे. यामुळे लवकरच या भागांमध्ये पाण्याची सोय न केल्यास येथील नागरिकांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार असल्याची परिस्थिती आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.