
राज्यात मान्सून पावसाने जोर धरलाय. संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडत असून अनेक जिल्ह्यातील नद्यांना पूर आलाय. अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. आज मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय. हवामान विभागाने मुंबई आणि पालघर पट्ट्यासाठी पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट जारी केलाय. मुसळधार पावसाचा फटका वाहतुकीला बसू शकतो. त्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीच्या समस्या सामोरे जावे लागू शकते.
पुढील २४ तासात मुंबईसह, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. याबाबतची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान खात्याने पुढील २४ तासांसाठी पालघर आणि मुंबई पट्ट्यासाठी रेड अलर्ट दिला आहे.
या कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उंच लाटांचा इशारा देण्यात आलाय. समुद्रात ३.५ ते ३.८ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.
या दरम्यान लहान बोटींना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय. किनारपट्टीजवळील पर्यटन व जलक्रीडा थांबवण्याचाही इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आलीय.
मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पावसामुळे विस्कळीत झालीय. तर पश्चिम रेल्वेवरील गाड्या वेळेत धावत आहेत. तसंच हार्बर रेल्वे देखील सुरू आहे. पण पावसाचा जोर वाढला तर चाकरमान्यांची हाल होऊ शकतात. अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ, वांद्रे या उपनगरात पावसाचे चांगलीच हजेरी लावल्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय. पश्चिम द्रूतगती महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
रायगड जिल्ह्याला आज पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. आज हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय. त्यामुळं रायगड जिल्ह्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसाचा मोठा फटका रोहा आणि सुधागड तालुक्यातील शहरांना बसलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.