
विनोद जिरे, साम टीव्ही | बीड
मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतलेले मनोज जरांगे पाटील यांनी नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारला पुन्हा अल्टिमेटम दिला आहे. २५ जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे. तुम्ही २५ तारखेआधी आरक्षण दिले नाही तर सळो की पळो करणार, असा निर्वाणीचा इशाराच जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे. २५ जानेवारी २०२५ रोजी बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर जरांगेंनी आज बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मराठा समाजाला गांभीर्याने घेतलं नाही तर काय होतं हे त्यांना चांगलं माहीत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनाही ते चांगलंच ठाऊक आहे. आता फक्त खांदे बदलले आहेत, असं जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमच्यात सरळ करण्याची ताकद आहे. महाराष्ट्रात २५ तारखेला काय होईल हे त्यांना दिसून येईल. त्यांचे भागले म्हणून ते आरक्षणाबाबत बोलत नाहीत. त्यांना पुन्हा मराठ्यांच्या दारातून जायचं आहे, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा विषय तडीला काढा. 25 जानेवारीची वाट पाहिली तर, राज्यातील सर्व समाज अंतरवालीला येणार आहे, असंही ते म्हणाले.
मनोज जरांगे यांनी नव्या महायुती सरकारला इशाराच दिला. कुणबी नोंदी शोधल्या पाहिजेत. काही कक्ष बंद पडले आहेत, ते सुरू करा. प्रमाणपत्रे वितरित केले जात नाहीत, याकडेही जरांगेंनी लक्ष वेधले. आम्ही याबाबत सरकारला निवेदन दिले आहे. तुम्ही सत्तेत असाल. बलाढ्य असाल. मात्र मराठ्यांपुढे सत्ता टिकत नाही हे तुम्हाला २५ जानेवारीला दिसून येईल, असं त्यांनी निक्षून सांगितले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ''मराठा आणि कुणबी एकच आहे. त्यामुळे तो अध्यादेश पारित करावा. हैदराबाद गॅझेट लागू करा. 'सगेसोयरे' अंमलबजावणी करा. या सर्व मागण्या २५ जानेवारीच्या आत मान्य करायच्या आहेत. नाही तर पश्चाताप करावा लागेल. तुम्ही आरक्षण दिले नाही तर, सळो की पळो करून सोडणार.'
जर समाज तुमच्यावर विश्वास ठेवत असेल आणि तुम्ही विश्वासघात करत असाल, तर आम्ही जास्त दिवस वाट बघणार नाही. नाइलाजाने आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल हे पोलीस प्रशासनाने लक्षात घ्यावे, असेही ते म्हणाले.
या प्रकरणात जे असतील त्या सर्वांवर तातडीने कारवाई करून अटक करावी लागेलच. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. आरोपीला अटक नाही केली तर आम्ही हे प्रकरण दाबू देणार नाही. यातून सुट्टी नाहीच, असंही जरांगे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.