Maharashtra Rain News Monsoon Alert : वेळेअगोदरच महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले, सोमवारी तळ कोकणात मोसमी वारे पोहोचल्याची वर्दी मिळाली. मान्सूनमुळे राज्यात धो धो पाऊस कोसळत आहे. मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिकसह राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. पुणे-नाशिकमध्ये रविवारी दुपारपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. तर मुंबईमध्ये सोमवारी सकाळपासून रिपरिप सुरू झाली आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील नद्यांची पातळी वाढली आहे. पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात सगळीकडे पाणी साचलेय. गावातील ओढे नाले भरून वाहत आहेत. आज राज्यात अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन ते चार तास मुंबई, पुण्यासह घाटमाथ्यावर अति मुसळधार पाऊस पडेल, असा अशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुण्यात पावसाचा कहर -
पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचे सत्र शहर आणि जिल्ह्यात कायम आहे. पुणे शहरात पावसाचे प्रमाण कमी असले, तरी जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले. गेल्या चार दिवसांत शहर आणि परिसरातील पावसाची तीव्रता वाढली आहे. हवामान विभागाने पुणे आणि परिसरासाठी ऑरेंज अलर्ट दिला होता, त्यानुसार शहर आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पुणे जिल्ह्यासाठी रविवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार पावसाने जिल्ह्यातील काही भागांना अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे ओढ्यांना पूर येऊन घरांमध्ये पाणी शिरणे, नागरिक अडकणे अशा घटना घडल्या आहेत. प्रशासनाला मदतकार्यासाठी पथके रवाना करावी लागली आहेत.
कोल्हापुरात कोसळधारा -
कोल्हापुरात सुरू आहे गेली चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील गांधी मैदानाचं झालं रूपांतर तळ्यात झाले आहे. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे गांधी मैदान पाण्याने काठोकाठ भरले आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राजाराम बंधाऱ्यासह रुई, इचलकरंजी, येवलुज, शिरोळ हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
सांगली येरळा नदी दुथडी भरून वाहतेय -
गेल्या पाच ते सहा दिवसापासून सांगली जिल्ह्यात पडत असलेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील येरळा नदी ही दुथडी भरून वाहत आहे. कडेगाव खानापूर आणि तासगाव तालुक्यातील वाहणाऱ्या या येरळा नदीचे पात्र पाण्याने पूर्ण भरले आहे. खानापूर तालुक्यातील वाझर येथील या येरळा नदीच्या पत्राचे हे विहंगम दृश्य आहे. येथील वाझर बंधारा तुडुंब भरला आहे. त्यातून पाण्याचे हे असे मार्गक्रमण सुरू आहे.
भीमा नदीला पूर -
भिमाशंकर परिसरात अतिवृष्टीने हाहाकार माजवला. डोंगरकड्यावरील ओढे नाले दुथडी भरुन वाहत आहेत. भीमा नदीला पहिल्याच पावसात पूर आळा आहे. भीमा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे भात खाचरांचे नुकसान झाले आहे. रात्रभर सुरु असलेला पाऊस सकाळी थांबला मात्र शेतीसह पशुधनाचे मोठं नुकसान झाले आहे.
कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ
पाच ते सहा दिवसापासून सततच्या पडणाऱ्या पावसामुळे सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळी मध्ये पाण्याची वाढ झाली आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी ही जवळ जवळ पंधरा फुटापर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे शेतीला पूरक असा पाऊस पडत आहे. मात्र नदीच्या पाणी पातळीत ही वाढ होत आहे.
चंद्रभागेच्या पाणी पातळी दोन मीटरने वाढ
भीमा आणि नीरा खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. त्यामुळे भीमा नदीच्या पाणी वाढली आहे. पंढरपुरात चंद्रभागा नदीची पाणी पातळी दोन मीटर ने वाढली आहे. दरम्यान पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्याचे 40 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे चंद्र भागा नदी खळखळून वाहून लागली आहे. वीर धरणातून नीरा नदीत रात्री 10 वाजता सूमारे 30 हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
खामगावात मुसळधार, सूर्या नदीला पूर, खामगावशी चितोडा गावाचा संपर्क तुटला
बुलढाणा जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे, खामगाव तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने चितोडा पळशी येथील सूर्या नदीला पूर आल्याने खामगावशी चितोडा गावाचा संपर्क तुटला आहे.पाऊस धो धो कोसळत असल्याने नदी नाले ओढे दुथडी भरून वाहताना दिसत आहे. या पावसाने शेतातील मशागतीचे कामे खोळंबली आहेत.
मुसळधार पावसामुळे नद्या वरील बंधारे ओव्हरफ्लो
सातारा जिल्ह्याला हवामान खात्याने पुढील चार दिवस ऑरेंज दिला असून कोयना धरण परिसरात पडत असलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे कोयना नदीवरील सर्व बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. कोयना नदीवरील निसरे, तांबवे बंधाऱ्यावरून पाणी ओसडून वाहू लागले आहे. तर कराड तालुक्यातील खोडशी डॅम पूर्ण क्षमतेने भरल्याने तो ओव्हरफ्लो वाहू लागला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना कृष्णा नदीसह सर्व नद्यांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर वाढलेली पाहायला मिळत आहे.
मान्सूनच्या प्रवासाला खीळ, पेरणीची घाई न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
बळीराजासाठी एक महत्त्वाची बातमी! यावर्षी मान्सूनने वेळेआधीच महाराष्ट्रात हजेरी लावली असली तरी, आता मात्र त्याच्या वाटचालीस तात्पुरता विराम मिळण्याची शक्यता आहे. २५ मे रोजी मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला, जो सामान्य तारखेपेक्षा १० दिवस आधी आहे. ही आनंदाची बातमी असली तरी, २७ मे पासून मान्सूनचा वेग मंदावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाची संततधार
मान्सून तळकोकणात दाखल झाला असतानाच रायगड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. अलिबाग उरण परिसरात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची संततधार सुरू आहे. महाड, पोलादपूर , माणगाव, रोहा परिसरात रविवारी संध्याकाळ पासूनच सुरू झालेल्या जोरदार पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले आहे. रोहा शहरातील दमखाडी भागात मुख्य रस्त्यावर पाणी साचले आहे. ग्रामीण भागात छोटे नाले ओसंडून वाहत आहेत. या पावसाने जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. 12 तासात श्रीवर्धन मध्ये 136 तर मुरूड मध्ये 140 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.