भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी
नवी दिल्ली : राज्यात अखेरच्या टप्प्यातल्या मतदानाच्या आधीच शरद पवारांनी मोठे गौप्यस्फोट केल्यामुळे राजकीय वातावरण तापलंय. 2004 साली राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपदाची संधी होती. मात्र भुजबळांना मुख्यमंत्री केले असते तर राष्ट्रवादीत फूट पडली असती असा दावा पवारांनी केलाय. यावर भुजबळांनीही मोठे गौप्यस्फोट केले आहेत. या गौप्यस्फोटांवरचा हा रिपोर्ट.
राज्यातील निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदानापूर्वी पुन्हा 2004 निवडणुकीतल्या राजकीय कढीला ऊत आलाय. 2004 साली जास्त जागा जिंकूनही राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रिपद का घेतलं नाही यावर गेल्या 20 वर्षांत अनेकदा चर्चा रंगल्या आणि प्रश्नही उपस्थित झाले. मात्र पवारांनी याचं गूढ पहिल्यांदाच उघड करत मोठा गौप्यस्फोट केला. 2004 साली मुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीकडे योग्य नेता नव्हता असा दावा केला. पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्यावेऴी सर्वात ज्येष्ठ असलेल्या भुजबळांबाबतही मोठा गोप्यस्फोट केला.
भुजबळ एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनीही मुख्यमंत्रिपदाबाबत आणखी एक गौप्यस्फोट केला. काँग्रेसकडून आपल्याला मुख्यमंत्रिपदाची ऑफर होती असं सांगत पवारांसोबत गेल्यामुळे मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडावं लागल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. अजित पवारांनीही राष्ट्रवादीच्या फुटीनंतर वेळोवेळी 2004च्या मुख्यमंत्रिपदावरून पवारांना टार्गेट केलंय. काँग्रेसचीही मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी होती असा दावाही अजित पवार करत असतात. पक्षस्थापनेपासून पवारांना एकदाही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला नाही अशी टीका वारंवार होत असते.
2004 मध्ये पवारांनी ही संधी का सोडली याचा खुलासा तर केलाय. मात्र भुजबळांना संधी म्हणजे पक्षफुटीची नांदी होती असं सांगून पवारांनी नाशिकच्या मतदानापूर्वीचं टायमिंग साधून काही वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय का? अशी चर्चा रंगलीय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.