Maharashtra Politics : मविआचा जागावाटपचा फॉर्मुला ठरल्यात जमा, ठाकरेंची शिवसेना १०० जागांवर लढणार? काँग्रेस-राष्ट्रवादीला किती?

MVA Seat Sharing Formula for Maharashtra: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाबाबतचा फॉर्मुला ठरला आहे. शिवसेना १०० जागांवर निवडणूक लढणार तर इतर पक्षांसाठी किती जागा हे वाचा सविस्तर...
v
Mva Seat Sharing Formula for MaharashtraSaam Tv
Published On

आगामी विधानसा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील २८८ जागांपैकी उद्धव ठाकरे १०० जागांवर तर काँग्रेस १०० जागांवर निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला ८४ जागा मिळाल्या असून उर्वरित चार जागा मित्रपक्षांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. तिन्ही पक्ष ६० टक्के जागांवर एकमत आहेत. अजूनही काही जागांवर महाविकास आघाडीमध्ये वाद आहेत. मात्र ते लवकरच चर्चेतून सोडवले जातील असे देखील सुत्रांनी सांगितले.

महाविकास आघाडीत जागावाटपाच्या निर्णयाला उशिर होत असल्यावरून सध्या नाराजी दिसून येत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेस 'व्यस्त' असल्याचा आरोप करत विलंबासाठी काँग्रेसला जबाबदार धरले होते. निवडणुकीपूर्वी जास्त वेळ न घालवता जागावाटपाचा निर्णय घेण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहेत जेणेकरून सर्व पक्षांना आपापली तयारी व्यवस्थितरित्या सुरू करता येईल.

उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्यासोबत विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. लोकसभा निवडणुकीतही राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या जागांवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी बाजी मारली होती. आता ही निवडणूक देखील चांगल्या प्रकारे पार पडवी आणि लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील चांगला मतांनी विजय मिळवता यावा यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. २०१९ मध्ये राज्यातील निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. भाजपने १६४ जागांवर निवडणूक लढवली आणि १०५ जागांवर विजय मिळवला. शिवसेनेने १२६ जागांवर निवडणूक लढली होती आणि ५६ जागांवर विजय मिळवण्यात यश आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने १२१ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी त्यांना ५४ जागा जिंकण्यात यश मिळाले.

तर काँग्रेसने १४७ उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. यामधील फक्त ४४ उमेदवार विजयी झाले होते. यंदाची विधानसभा निवडणुक चुरशीची असेल कारण शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे ही निवडणुक महायुती आणि महाविकास आघाडीसाठी खूपच प्रतिष्ठेची मानली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com