Maharashtra Breaking News Live Updates : नांदेडच्या कृषी विभागात 6 कोटींचा घोटाळा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 28 March 2025: आज शुक्रवार दिनांक २८ मार्च २०२५, महाराष्ट्रातील ताज्या राजकीय घडामोडी, राज्यात अवकाळी पाऊस, कुणाल कामरा-एकनाथ शिंदे प्रकरण,मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Saam Tv Breaking News Live Updates In Marathi Maharashtra
Saam Tv Breaking News Live Updates In Marathi MaharashtraSAAM TV
Published On

Nanded : नांदेडच्या कृषी विभागात 6 कोटींचा घोटाळा.

नांदेडच्या कृषी विभागात 6 कोटींचा घोटाळा झाला आहे. 11 कृषी पर्यवेक्षकासह 3 कृषी केंद्र चालकांवर फसवणुकीचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

Panvel : पनवेलमध्ये शरद पवारांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत

पनवेलमध्ये शरद पवारांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं.

रयत शिक्षण संस्थेच्या नव्या इमारतीचे उदघाटन करण्यासाठी शरद पवार पनवेलमध्ये.

तळोजा येथील वावंजे परिसरात रयत शिक्षण संस्थेची नवी इमारत.

शरद पवार यांच्या हस्ते नव्या इमारतीचे उदघाटन.

मुरबाडमध्ये २५० वर्ष जुना झुंजारराव वाड्याला भीषण आग

मुरबाड तालुक्यातील सरळगाव जवळील नेवाळपाडा येथील २५० वर्ष जुन्या वाड्याला भीषण आग लागली आहे.

या आगीत संपूर्ण वाडा जळून खाक झाला मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

18व्या शतकामध्ये जयराम झुंजारराव यांनी हा वाडा बांधला होता.

कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाचा दिलासा, ७ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश

पुण्यात पुन्हा अंमली पदार्थांची तस्करी; शहरात खळबळ

हडपसर परिसरातून अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त

पुणे पोलिसांकडून 13 लाख 17 हजार किंमतीचे मेफेड्रॉन जप्त

पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पुणे शहरात मेफेड्रॉनची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी केली अटक

मोहम्मद नवाब मोहम्मद अख्तर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून सोलापूर विद्यापीठासमोर आंदोलन

- सोलापूर विद्यापीठाच्या विविध मागण्यांसाठी एबीव्हीपी संघटनेकडून छात्र उद्रेक मोर्चा

- सोलापूर विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध समस्येंसाठी अखिल भारतीय विद्यार्थी संघटना आक्रमक

- सोलापूर विद्यापीठाच्या समस्येसाठी प्रमुख 28 मागण्यांसाठी भारतीय विद्यार्थी परिषद संघटना आक्रमक

- सोलापूर विद्यापीठात भर उन्हात ठिय्या आंदोलन करत विद्यापीठ प्रशासनाचा केला निषेध

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा उपक्रम विद्यार्थ्यांना दिले अग्नीसुरक्षेचे धडे

शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून विविध उपाय योजना राबवल्या जात आहेत शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत .

त्या पाठोपाठ शाळांमध्ये अचानक आगी सारखी दुर्घटना घडल्यास सुरक्षिततेसाठी विद्यार्थ्यांना अग्नि सुरक्षेचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात आहेत.

आग लागल्यास कसा बचाव करावा, कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत कल्याण अग्निशामन दलाच्या वतीने कल्याण पश्चिमेतील शाळेत विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पंढरपूर दौऱ्यावर

मुख्यमंत्री झाल्यापासून फडणवीस यांचा पहिलाच पंढरपूर दौरा विठ्ठल दर्शनासाठी जाणार देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पंढरपूर दौऱ्यावर

सोन्याच्या दरात एका दिवसात 1500 रुपयांनी वाढ

गेल्या दोन दिवस आधी जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याचे दर 88 हजारावर असताना आज हाच दर पंधराशे रुपये वाढला असुन 89 हजार 300 रूपयांवर सोने पोहचले आहे.

गेल्या हेच दर जीएसटी सह 92 हजार पर्यंत गेल्याने जळगावच्या सुवर्णनगरीत ग्राहकांचा काहीसा कमी प्रतिसाद दिसून येत असून स्वर्णनगरीमध्ये शुकशुकाट पहावयास मिळत आहे.

2 एप्रिल रोजी ट्रारिफ रेट लागु होणार असल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याची प्रतिक्रिया सुवर्ण व्यवसायिक यांनी दिली.

कोर्टाबाहेर प्रशांत कोरटकरवर वकिलाचा हल्ला

कोल्हापूर कोर्टात आज प्रशांत कोरटकरची सुनावणी होती, या दरम्यान कोर्टाच्या बाहेर त्याच्यावर एका वकिलाने हल्ला केला आहे

प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलिस कोठडी

इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी

प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलिस कोठडी

बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात आपलेच आमदार असायला हवे, शिवसेनेच्या संवाद बैठकीत आमदार शरद सोनवणे यांचा दावा

बारामती लोकसभा मतदारसंघात सर्व सहा मतदारसंघात विजय बापू शिवतारे यांनी आपले आमदार निवडणुन आणले पाहिजे कारण राजकारणात काहीही होऊ शकतो उद्या म्हणाले तुमच्या ताकतीवर लढा

आपली स्वतःची ताकद भरकम्म हवी, पक्षाने आदेश दिला आणि उद्याची शिरूर लोकसभा जिंकायची आदेश दिले तर जिंकणारच आणि उतकंच नाही तर लोकसभा मतदार संघात सर्व आमदार निवडून आणणार

महायुतीतील अजित पवारांच्या बारामतीवर शिवसेनेचा डोळा

केज पोलीस ठाण्या बाहेर ऊसतोड कामगाराचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला

बीडच्या केज पोलीस ठाण्याबाहेर एका ऊसतोड कामगाराने पत्नी सोबत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

पुष्पा मोहन ढाकणे आणि त्यांचे पती मोहन ढाकणे हे दोघे ऊसतोड कामगार आहेत. त्यांना तीन ऊसतोड कामगार देतो म्हणून गावातीलच बाजीराव ढाकणे याने एक लाख 40 हजारांची फसवणूक केली.

याची तक्रार या दांपत्याने पोलीस ठाण्यात केली. मात्र कोणतीच कारवाई होत नसल्याने संतप्त होत हे दोघे पती-पत्नी पोलीस ठाण्यात पोहोचले. याच दरम्यान मोहन ढाकणे यांनी पतीसोबतच आत्मदहनाचा प्रयत्न केला.

केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी वेळीच हस्तक्षेप करून पुढील होणारा अनर्थ रोखला आहे.

Nashik: हंडा मोर्चा घेऊन आलेले आंदोलकांमध्ये आणि मनपाच्या सुरक्षारक्षकांमध्ये राडा

- आयुक्तांना भेटण्यासाठी आलेल्या आंदोलकांना आता सोडत नसल्याने गोंधळ

- सुरक्षा रक्षक आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की

- आंदोलन आत मध्ये जाण्याच्या भूमिकेवर ठाम

- भाजपचे पदाधिकारी असलेले पप्पू माने यांच्या नेतृत्वात आणण्यात आला होता मोर्चा

- आयुक्तांना भेटण्यासाठी सुरक्षा रक्षक आंदोलकांना आत सोडत नसल्याने गोंधळ महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच गोंधळ

साताऱ्यातील छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रिय खंड्या नामक श्वानाची साताऱ्यात समाधी

रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जवळ असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू स्वराज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे प्राणी प्रेम आपल्याला इतिहासात नमूद असल्याचा पाहायला मिळत.आज देखील छत्रपती शाहू महाराजांचा अत्यंत प्रिय असलेल्या खंड्या नामक श्वानाची समाधी साताऱ्यातल्या संगम माऊली परिसरात आहे.या खंड्या नावाच्या श्वानाची समाधी लाल दगडामध्ये बांधलेली आहे, सुमारे 250 वर्ष पूर्वीपासूनची ही समाधी असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.या खंड्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो छत्रपती शाहू महाराजांचा अत्यंत प्रिय आणि इनामदार कुत्रा होता..खंड्याने शिकारीदरम्यान छत्रपती शाहू महाराजांचे प्राण वाचवताना स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. छत्रपती शाहू महाराजांनी या खंडाची समाधी संगम माहुली मध्ये बांधली होती. ही समाधी अजूनही साताऱ्यातील संगम माऊली परिसरामध्ये पहावयास मिळते.

Thailand Earthquake: थायलंडमधील बँकॉक शहरात मोठा भूकंप

११ वाजून ५२ मिनिटांनी भूकंपाचे मोठे धक्के

७.३ रिश्टर स्केल इतका मोठा भूकंपाने थायलंड हादरले

Kalyan : आंबिवलीतील कुख्यात गुन्हेगार जाफर इराणी चेन्नईत चकमकीत ठार

कल्याणजवळील आंबिवलीतील इराणी वस्तीत राहणारा सराईत सोनसाखळी चोर जाफर गुलाम इराणी बुधवारी चेन्नई येथे पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला.

जाफर आपल्या दोन साथीदारांसह १० किलो सोन्याची चोरी करून विमानाने हैदराबादला पळण्याच्या प्रयत्नात होता.

मात्र, पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि चकमक सुरू झाली. त्यात जाफर ठार झाला, तर त्याचे दोन साथीदार गंभीर जखमी झाले.

चेन्नईहून जाफरचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांनी कल्याणमध्ये आणला असून आज आंबिवली जवळील बनेली स्मशानभूमीत त्याच्या दफनविधीसाठी मोठ्या प्रमाणात जमाव आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वडगाव शेरीत पाण्यावरून राजकारण,   महिला आक्रमक होत फोडले मडके

वडगावशेरी परिसरात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने भीषण परिस्थिती उद्भवली आहे.

सातत्याने पाणीपुरवठा अधिकारी सोबत संपर्क साधून देखील ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकान समवेत आमरण उपोषण सुरु केलं आहे.

वडगाव शेरी मधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित झालेत.

अनेक दिवसापासून पाण्याची समस्या उद्भवली नागरिक आक्रमक झाले त्यांनी आंदोलन स्थळी मडके फोडत पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला.

संकेत गलांडे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं.

या पुढील काळात पाण्याची व्यवस्था केली नाही तर रास्ता रोको करू असा इशारा आंदोलन करतांनी दिला.

पाण्याचा राजकारण केलं जात असल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे.

इंदापूरमध्ये उसतोड मजुरांना जबरदस्तीने डांबून ठेवण्याचा प्रकार, 41 मजुरांची सुटका

इंदापूर तालुक्यातील रेडा गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ऊस तोडणीसाठी नेण्यात आलेल्या मजुरांना नजरकैदेत ठेवून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याची गंभीर तक्रार नोंदवण्यात आली आहे.

या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ऊसतोड मजुरांना फसवून नजरकैदेत ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

फिर्यादी विष्णु नारायण गायकवाड ( नेवपुर, जि. संभाजीनगर) याने इंदापूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार, रघुनाथ धनाजी सोनवणे या मुकादमाने मजुरांना ऊसतोडणीसाठी पैसे देतो असे सांगून रेडा गावात पाठवले. मात्र, मजुरांचे पैसे न दिल्याने ते अडकून पडले.

संजय पांडुरंग देवकर आणि विकास पांडुरंग देवकर यांनी त्यांना नजरकैदेत ठेवले. मजुरांना कुठेही जाऊ दिले जात नव्हते, शिवाय त्यांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात होते.

या प्रकरणी रघुनाथ धनाजी सोनवणे, संजय पांडुरंग देवकर आणि विकास पांडुरंग देवकर यांच्या विरोधात BNS 2023 कलम 118(1), 352, 351(2), (3), 3(5) आणि बंध बिगार पद्धती अधिनियम 1976 चे कलम 16, 17, 18, 19 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पार पडले माळेगांव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

बारामती तालुक्यातील माळेगांव सहकारी साखर कारखाना परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरण करण्यात आलेय.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज या नूतनीकरण करण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पार पडले आहे.

आरटीईसाठी 1 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

निवड यादीतील प्रवेश निश्चित करण्याची मुदत होती 10 मार्च पर्यंत

प्रवेशासाठी 8863 शाळांमध्ये एक लाख 9 हजार 87 एवढ्या प्रवेशाच्या जागा उपलब्ध होत्या

यासाठी तीन लाख पाच हजार 151 मुलांचे अर्ज दाखल झाले होते

यात बहुसंख्य मुलांना घराजवळ असलेल्या शाळा न मिळाल्यामुळे त्यांचे प्रत्यक्षात प्रवेश झालीच नाहीत

या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीतील पहिल्या टप्प्यामधील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला एक एप्रिल पर्यंत मुदत वाढ

Pandharpur News: पंढरपुरात धनगर समाजाचे आंदोलन

मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांची बदनामी केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात आज सकल धनगर समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

येथील छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार रोहित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सोलापूर येथे झालेला हल्ला आमदार रोहित पवार यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप धनगर समाजाचे नेते माऊली हळणवर यांनी केला आहे.

Pune News: पुण्यात सराईत गुन्हेगाराचा मोठा ताफा रस्त्यावर

पुण्यातील सराईत गुंड मंगेश कदम उर्फ मंग्या हा एवढा ताफा घेऊन एका नेत्याच्या वाढदिवसाला

किरकिटवाडी मधली रिल्स सोशल मीडियावर व्हायरल

सराईत गुंड हसन शेख यांच्या हत्येतील मास्टर माईंड मंगेश कदम व आरोपी होता

पण हसन शेख हत्येच्या आरोपातून मंगेश कदम निर्दोष मुक्त झाला आहे

मंगेश कदम पुन्हा सक्रिय. रॅली काढून वर्चस्व दाखवण्याचा कदमचा प्रयत्न

2017 ला हत्या झाली होती हसन शेखची सासवड हद्दीत त्यातील मास्टरमाइंड मंगेश कदम

माजी विरोधी पक्षनेते महेश खोमणे यांच्या तक्रारीनंतर मनपा कचरा निविदा प्रक्रियेस मुख्यमंत्र्यांनी दिली स्थगिती

घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रक्रिया राबवताना मनपाने ठराविक कंत्राट दाराचे हित जोपासले आहे असा आरोप करत माजी विरोधी पक्षनेते महेश खोमणे यांनी निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली होती.

खोमणे यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. निविदा प्रक्रियेची चौकशी करून अहवाल सादर करावा तोपर्यंत अंतिम निर्णय घेऊ नये असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

त्यामुळे कचरा निवेदा प्रक्रियेला आता ब्रेक लागला आहे. मागील तीन वर्षापासून मनपावर प्रशासक राज आहे. शहरातील कचरा संकलनाचे काम आर अँड बी या कंपनीला देण्यात आले. या कंपनीला सात वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती.

सात वर्षानंतर पुन्हा आर अँड बी याच कंपनीला कचरा संकलनाचे काम देण्याचा घाट महापालिकेने घातला. त्यामुळे महापालिकेने राबविलेली ही निविदा प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

दरम्यान या निविदा प्रक्रियेच्या विरोधात महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते महेश खोमणे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली.

खोमणे यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश दिल्याची माहिती महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते महेश खोमणे यांनी दिली

Solapur: अक्कलकोट श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा उत्साहात साजरा होणार

सालाबादप्रमाणे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा 31 मार्च रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे.

याअंतर्गत पहाटे 4 वाजता प्रभातफेरी, 5 वाजता काकड आरती, तसेच 10 ते 12 दरम्यान भजन सेवा, दुपारी 12 वाजता पारंपरिक पद्धतीने श्रींचा जन्मसोहळा, पाळणा कार्यक्रम संपन्न होईल.

त्यानंतर स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय 30 मार्च रोजी गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेचे पूजन होणार आहे.

तरी सर्व स्वामी भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.

यवतमाळात युवकाचा आढळला संशयास्पद मृतदेह

यवतमाळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरामध्ये एका 28 वर्षीय युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला.अक्षय निरंजन शेंडे असे मृत युवकाचे नाव आहे. अक्षय हा बाजार समितीमध्ये हमालीचे काम करीत होता 27 मार्चला तो कामाला जातो म्हणून घरून निघून गेला.आज सकाळी अक्षयचा मृतदेहच आढळून आला असून या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळतात पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाची पाहणी केली. मृतकाच्या डोळ्याजवळ जखमा आढळून आली तसेच खिशामध्ये विषारी औषधी आढळून आल्याने अक्षय ने आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला याचा तपास शहर पोलीस करीत आहे.

Maharashtra Breaking News Live Updates : लातूरच्या वीस वर्षीय तरुणांचे अवयवदान, सहा जणांचे फुलले आयुष्य..

लातूरच्या औसा रोडवरील वासनगाव पाटी येथे वीस वर्षाच्या भावेश तिवारी याचा भीषण अपघात झाला होता. अपघातात भावेश तिवारी याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर हैदराबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र दुचाकी अपघातात ब्रेनडेड झालेल्या भावेश तिवारी याच्या आई-वडिलांच्या संमतीने हैदराबाद येथे अवयवदान करण्यात आले आहे, दरम्यान भावेश तिवारी च्या आई वडिलांच्या प्रेरणादायी निर्णयामुळे सहा जणांचे आयुष्य फुलले आहे.. तर आज लातूर येथे भावेष वर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे....

तुळजाभवानीच्या चैत्र-यात्रेदरम्यान कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन सज्ज

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानची चैत्र यात्रा काही दिवसातच सुरू होणार आहे.या यात्रेसाठी महाराष्ट्रासह परराज्यातील भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत असतात.तुळजापुरात येणाऱ्या भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन कोणतीही आपत्ती जनक परिस्थिती निर्माण झाल्यास भाविकांना इजा होऊ म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने मुंबई येथील स्पेशल टीम कडून तुळजाभवानी मंदिरात सुरक्षेची जबाबदारी पाहणाऱ्या शिंग इंटेलिजंट सेक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे तीन दिवसीय प्रशिक्षण दिले.

महाडमध्ये नक्षलवाद्याला अटक

बिहार स्पेशल टास्क फोर्सने महाड MIDC मध्ये कारवाई करीत केली अटक

० अटक केलेल्या नक्षलवाद्याच्या विरोधात बिहारमध्ये दाखल आहे देशद्रोहाचा गुन्हा

० बिहार स्पेशल टास्क फोर्सची महाड MIDC मध्ये मोठी कारवाई

० काही दिवसा पूर्वी बंगाला देशी नागरीकांवर देखील झाली होती महाडमध्ये कारवाई

नागपूर हिंसाचार प्रकरणात तिसरी मोठी अटक

- फैजान खातीब याला हिंसाचाराच्या सुमारे दहा दिवसानंतर पोलिसांनी केली अटक, हा एका संघटनेशी निघडीत आहे..

- पोलीस सूत्रानुसार फैजान खातीब हा जहाल विचारांचा असून त्याने जमावाला भडकावले होते

- फैजान खातीब सह आणखी एक आरोपी शहबाझ काझी यालाही पोलिसांनी अटक केली आहे

- नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांकडून आरोपींचे अटकसत्र अजूनही सुरूच

- फैजान खातीब हा अकोल्यामध्ये असतो मात्र ईद निमित्त महिनाभरापूर्वी तो त्याच्या मूळगावी म्हणजेच नागपुरात आला होता

- 17 मार्चला नागपूरला झालेल्या हिंसाचाराचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ फुटेच्या माध्यमातून खातीबला पोलिसांनी अटक केली आहे

- नागपूर हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहिम खान आणि मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनिअर नंतर फैजान खातीब ही या प्रकरणातील तिसरी मोठी अटक मानल्या जात आहे

त्र्यंबकेश्वर हेच कुंभमेळ्याचे मूळ स्थान, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री हरीगिरी महाराज यांचा मोठा दावा

- अमृताचे थेंब केवळ त्रंबकेश्वरमधील कुशावर्तातच पडल्याची पुराण आणि इतिहासात नोंद

- नाशिकच्या रामकुंडात आमच्यासाठी तीन तास राखून ठेवण्यात आल्याचा नवीन दावा

- वेळ पडल्यास आम्ही यावेळी नाशिकमध्येही शाही स्नान करू, सेवा आखाड्याचा इशारा

- पेशव्यांच्या काळात संघर्ष टाळण्यासाठी वैष्णवांसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये शैव साधूंनी शाही स्नान करण्याची झाली होती विभागणी

- प्रशासनाने आणि वैष्णव आखाड्यांनी नाशिक कुंभमेळा असा सर्वत्र प्रचार केल्यानंतर शैव आखाडे आक्रमक

- नाशिक आणि त्रंबकेश्वर कुंभमेळ्याच्या वादामध्ये हरीगिरी यांच्या वक्तव्याने भाविकांच्या श्रद्धेला जाणार तडा, त्र्यंबकेश्वरकडे स्नानासाठी वाढणार ओढा

- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये बैठकांचा धडाका

- त्र्यंबकेश्वरमध्ये शैव तर नाशिकमध्ये वैष्णव आखाड्यांसोबत प्रशासनाच्या बैठका

- त्र्यंबकेश्वरमध्ये नगरपरिषद कार्यालय तर नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यलयात होणार साधू महंतांची बैठक

- या दोन्ही बैठीकाला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन देखील राहणार उपस्थित

- गेल्या काही दिवसांपासून कुंभमेळ्याच्या नामकरणावरून सुरू आहेत वाद, यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता

- कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत देखील होणारे चर्चा

- त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या बैठकीला शैव आखाड्याचे महंत तर नाशिकमध्ये होणाऱ्या बैठकीला वैष्णव आखाड्याचे महंत असणार उपस्थित

Maharashtra Breaking News Live Updates : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शैव आखाड्यांचा नवा प्रस्ताव

- त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्तावर केवळ आखाड्यांचे देवता पंच परमेश्वर स्नान करतील

- इतर सर्व आखाडे आणि भाविकांनी पवित्र गोदावरी नदीत स्नान करावे

- त्यासाठी प्रशासनानं गोदावरी पात्राची व्यवस्था करावी

- रात्री उशिरा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत झालेल्या बैठकीत आखाडा परिषदेने ठेवला प्रस्ताव

- अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत रवींद्रपुरी महाराज, महामंत्री हरिगिरी महाराज यांच्यासह अन्य साधू महंत बैठकीला होते उपस्थित

- प्रस्तावावर प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहणं असणार महत्त्वाचं

आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत कोणता मुद्दा मांडला हे एकदा त्यांच्या वडीलांनी सांगावे- वैभव नाईक

गेल्या दोन अधिवेशनात कुडाळ-मालवणचे सध्याचे आमदार निलेश राणे यांनी कोणता मुद्दा मांडला हे एकदा त्यांच्या वडीलांनी सांगावे. फक्त टीका करण्यासाठी ते एक दोन वेळा उठले. मात्र संविधानीक माध्यमातून त्यांनी मतदारसंघातला कोणताही मुद्दा मांडला नाही हे रेकॉर्ड वर आहे. मी विधानसभेत जे मुद्दे मांडायचो ते अधिवेशन संपल्यावर जनतेसमोर मांडायचो. कालच्या बजेट अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भोपळा आला. आताचे सत्ताधारी या अधिवेशनात कमी पडले ही वस्तुस्थिती आहे. मात्र आपल खोट ते खर असल्याचे सांगून रेटायच हे राणे पितापुत्र करत आहेत. मात्र त्यांची पोलखोल जनता निश्चित काही दिवसात करेल. अशा शब्दात वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांना डीवचल आहे.

धक्कादायक....! जिजाऊंच जन्मस्थान असलेल्या राजवाड्याच पावित्र्य धोक्यात.

जगभरातील शिवप्रेमींच श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी राजे यांच्या मातोश्रींच जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाडा परिसरातच आता अवैध धंद्यावाल्यांनी चक्क वरली आणि मटक्याचे अड्डे सुरू केले आहेत. जगभरातून शिवप्रेमी व पर्यटक राजमाता जिजाऊंना वंदन करण्यासाठी सिंदखेड राजा येथे येत असतात, मात्र त्यांच स्वागतच अशा वरली आणि मटक्याच्या अड्ड्यांनी होत असल्यामुळे राजवाड्याचं व जिजाऊंच्या जन्मस्थानाच पावित्र्य धोक्यात आल्याच म्हणत सिंदखेडराजा येथील समाजसेवकांनी हे अवैध धंदे बंद करावे असे निवेदन पोलीस प्रशासनाला देऊनही काही फायदा झाला नाही. म्हणून सिंदखेडराजा येथील समाजसेवकांनी राजवाड्यासमोरच उपोषण सुरू केल आहे. मात्र अद्यापही जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली नाही.

Maharashtra Breaking News Live Updates : अमरावतीत 31 मार्चला प्रवासी विमानसेवा सुरु होणार का हा संभ्रम..

संपूर्ण अमरावती जिल्हा वासियांना प्रतीक्षा लागून असलेल्या अमरावतीच्या विमानतळावरून 31 मार्चला प्रवासी विमानसेवा सुरू होणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली... परंतु अमरावतीच्या विमानतळावर एअरलाइन्सच्या साईडवर ना विमानतळाचे नाव आले.. ना तिकीट विक्री सुरू झाली.. या विमानतळावर अलायन्स सेटअपस अद्याप तयार झाले नाही,त्यामुळे 31 मार्चला पहिल्या विमान उड्डाण बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आठवड्यातून तीन वेळा 72 आसनी विमानसेवा सुरू होणार असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं होतं,मात्र या ठिकाणी विमान,विमानातील कृ मेंबर्स, एअर होस्टेस,वैमानिक,विमानतळ कार्यालय,चेकिंग,चेकाउट,प्रवासांचे बॅग तपासणी यंत्रणा ही व्यवस्था अद्यापही झाली नाही,त्यामुळे 31 ला अमरावती विमानतळावरून विमान सेवा सुरू होण्याची शक्यता फारच कमी आहे.

दस्त नोंदणी कार्यालयातील सर्वर डाऊन, नोंदणी महानिरीक्षक यांची केली चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार

दस्त नोंदणी विभागामध्ये गेल्या काही दिवसांपासुन मुद्रांक शुल्क वाढणार या भीतीने मार्चच्या 15 तारखेपासुन प्रचंड गर्दी ही नोंदणी कार्यालयामध्ये होत आहे.

कोटयावधींचा स्टॅम्प डुटी भरून देखील लोंकाना सुविधा तर सोडा सर्वर स्लोचा सामना करावा लागत आहे.

दस्त नोंदणी पासुन दस्त स्कॅनिंग पर्यंत एका दस्तास दोन तास प्रक्रिया चालत आहे. तसेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन मध्ये रेंट अँगरिमेंट हे एका ऑफिसमध्ये तीनसेहुन अधिक दस्त रोज पेंडीग आहेत.

परंतु नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे हे याकडे पुर्णपने दुर्लक्ष करीत आहेत.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील महसुल मंञी चंद्रशेखर बावणकुळे यांचेकडे तक्रार करणार आहेत. हीच परिस्थिती संपूर्ण राज्यात आहे.

राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर

सकाळी 10 वाजता अमरावतीत आगमन.. माजी खासदार नवनीत राणांच्या घरी सांत्वन भेट..

10.30 वाजता नियोजन भवन येथे क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत पुरस्कार वितरण कार्यक्रमात उपस्थिती..

दुपारी 12 वाजता बावनकुळे यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे..

दुपारी 1 वाजता नियोजन भवन येथे जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले..

Sangli : विटा पोलिसांनी केले दोन अट्टल मोटरसायकल चोरट्याना गजाआड केले

विट्यासह आटपाडी, कडेगांव, कासेगांव सातारा शहर, तळबीड, हातकलंगले पोलिस ठाण्यात दाखल असलेले मोटरसायकल चोरीचे दाखल असलेले 10 गुन्हे उघडकीस आणून

दोन अट्टल मोटरसायकल चोरट्यांना गजाआड करण्यात सांगलीच्या विटा पोलिसांना यश आले आहे.प्रितम सदाशिव शिंदे आणि बादल अब्दुल पिरजादे या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे पावणेचार लाख रुपये किंमतीच्या एकूण दहा मोटरसायकल जप्त केल्या आहेत.

विट्यात भाजपाकडून आमदार रोहित पवारांच्या विरोधात आंदोलन,अटकेची करण्यात आली मागणी.

अँकर - सांगलीच्या विटा येथे भाजपाच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे.सोलापूर मध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्ल्याचा प्रकार घडला होता,या हल्ल्याचा मास्टरमाइंड आमदार रोहित पवार असल्याचा आरोप करत खानापूर तालुका भाजपाच्यावतीने आमदार रोहित पवारांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी रोहित पवारांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला,शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत आमदार रोहित पवारांचा निषेध नोंदवत,आमदार रोहित पवारांना अटक करावी,अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

Maharashtra Breaking News Live Updates : जगातील 15 उष्ण शहरात विदर्भातील चार शहरांचा समावेश

- ब्रम्हपुरी जगातील 8 व्या क्रमांकाचे उष्ण शहर..

- नागपूर अकराव्या तर अकोला, चंद्रपूर चौदाव्या पंधराव्या क्रमांकावर

- एलडोराडो नावाच्या संकेतस्थळावर दररोज जगभरातील सर्वाधिक उष्ण आणि थंड शहरांची यादी प्रकाशित होते

- या यादीनुसार गुरुवारी जगभरातील सर्वाधिक उष्ण शहराच्या यादीत भारतातील पाच शहर होती यातील चार विदर्भातील तर पाचवे शहर प्रयगराज होते.

नवी मुंबईत पाणी पुरवठा राहणार बंद

सिबिडी सेक्टर 28 येथे अमोरबे धरणाच्या मुख्य जल वाहिनीला झालेल्या गळतीमुळे आज नवी मुंबईत पाणी पुरवठा राहणार बंद.

सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा राहणार बंद.

आज संध्याकाळचा पाणी पुरवठा राहणार बंद तर उद्या सकाळी कमी दाबाने होणार पाणी पुरवठा.

धाराशिव जिल्ह्यात 69 शेतकऱ्यांनी केली तुरीची नोंदणी,नोंदणीसाठी 15 दिवसाची मुदतवाढ

नाफेड च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या तुर खरेदी नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील तुर उत्पादक शेतकऱ्यांना 7 एप्रिल पर्यंत तुरीची नोंदणी करता येणार आहे.तुर नोंदणीला पहील्या टप्प्यात 24 फेब्रुवारीपासुन 30 दिवसापर्यंत मुदत होती 24 मार्च पर्यंत जिल्ह्यातील 69 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असुन केवळ 27 जणांना तुर खरेदीसाठी संदेश पाठवले आहेत. जिल्ह्यात तुर खरेदीसाठी 21 केंद्र मंजुर आहेत माञ त्या तुलनेत तुरीची नोंदणी व झाल्याने एकही क्विंटल तुरीची खरेदी झाली नाही.

जिल्हा मध्यवर्ती बँकेला 685 कोटीचे उद्दिष्ट

शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी गुढीपाडव्यानंतर सुरू होते नांगरणी पासून तर बी बियाण्याची खरेदी यादी कामाची लगबग सुरू होते त्यामुळे वेळेवर पीककर्ज मिळावे याकरिता खरीप हंगामासाठी बँकांना पीक कर्ज वाटप चे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले असून अपेक्षाप्रमाणे यंदाही यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेला सर्वाधिक 685 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहेत तर स्टेट बँकेला 570 कोटी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी निश्चित करून दिले.

बुलढाण्यात उन्हाळी भुईमूग पेरणीचे क्षेत्रफळ वाढले

यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली, सध्या भुईमुगाचे पीक चांगलेच बहरत आहे, मात्र हवामानातील बदल, जमिनीत जास्त ओलावा आणि तापमानातील चढ-उतार यामुळे भुईमुगावर बुरशीजन्य रोगांचा संभाव्य धोका वाढला आहे, त्यामुळे पांढरी बुरशी, मूळकूज आणि खोडकूज होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे..

यावर्षी 5 हजार 957 हेक्टर क्षेत्रफळावर उन्हाळी भुईमुगाची लागवड करण्यात आली आहे...

Solapur Live : - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अखेर जाहीर

- 27 एप्रिल रोजी मतदान तर 28 एप्रिल ला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार

- काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने विरुद्ध भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलमध्ये होणार मुख्य लढत

- भाजपाचे विद्यमान आमदार आणि बाजार समितीचे सभापती विजयकुमार देशमुख यांनी निवडणुकीतून घेतली माघार

- दिलीप माने आपला गड राखणार की सचिन कल्याणशेट्टी बाजार समितीवर ताबा मिळवणार हे पाहणं औत्सुक्याचं

- मागील निवडणुकीत तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख विरुद्ध तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यात लढत झाली होती.

- यंदा मात्र विद्यमान सभापती विजयकुमार देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने मोठी खळबळ उडालीय

- 25 ते 28 मार्च दरम्यान अर्ज विक्री आणि 1 एप्रिल रोजी अर्जाची छानणी तर 2 ते 18 एप्रिल दरम्यान अर्ज माघार. घेण्याची प्रक्रिया पार पडणार आहे

- काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी सभापती दिलीप माने यांना विधानसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती

- त्यामुळे आता बाजार समितीवर आपली सत्ता प्रस्थापित करणे दिलीप माने यांना राजकीय अस्तित्वासाठी अनिवार्य आहे

- त्यामुळे सुरवातीपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीवर दिलीप माने वर्चस्व राखणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Solapur : सोलापुरात बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना आले सुगीचे दिवस

सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु असल्याने बेदाण्याला बाजारात आहे मोठ्या प्रमाणात मागणी..

बेदाण्याला 250 ते 400 रुपये प्रतिकिलो दर बाजारात मिळतोय.

सांगली, तासगाव, कलबुर्गी, विजयपूर, बिदर, बसवकल्याण भागातील खरीददार सध्या सोलापुरात येत आहेत.

यंदाच्या वर्षी बेदाण्याचं उत्पादन कमी असल्याने दर सुरुवातीपासून चढेच दिसून येतायत.

त्यामुळे यंदा बेदाणा उत्पादक शेतकरी मालामाला होत असल्याच चित्र दिसून येत आहे.

Nashik News : नाशिकच्या सिन्नरला रुग्णवाहिका संघटनेकडून सहकाऱ्याला अखेरचा सलाम

नाशिकच्या सिन्नर रुग्णवाहीका संघटनेने आपल्या चालक सहकाऱ्याला मृत्यू पश्चात अखेरचा निरोप दिला. गणेश काकड याने 27 मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र गणेश काकड हा सहकार्य आणि सामाजिक कार्य करणारा रुग्णवाहीका चालक म्हणून गेल्या काही वर्षात प्रकाशझोतात होता. त्याच्या मृत्यू पश्चात सिन्नर तालुका रुग्णवाहीका चालक मालक संघटनेने सर्व रुग्णवाहीका दिमतीला घेत अंत्ययात्रेत दिवा लावून मार्च करत आपल्या लाडक्या सहकाऱ्यास अखेरचा सलाम दिला.15 किलोमीटर पर्यंत शव वाहतूक करण्यास मोफत सेवा. गरजू व्यक्तींना वेळ प्रसंगी सवलत, पोलीस असो कि पत्रकार, डॉक्टर असो कि रुग्णसेवक या सर्वांना मदत म्हणून गणेश काकड अग्रेसर असायचा. गेल्या 5 ते 6 दिवसापासून तो तणावात असल्याचे त्याचे सहकारी सांगतात. आज मोठ्या जनसमुदायासह अंत्ययात्रा पार पडली, तेव्हा पोलीस कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी, पत्रकार, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा परिवाराच्या सांत्वनासाठी समावेश होता.

Nagpur पोलीस कर्मचाऱ्याने दारू पिऊन घातला गोंधळ, गुन्हा दाखल

- वाडी पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस कर्मचाऱ्याने दारू पिऊन घातला गोंधळ, गुन्हा दाखल

- प्रदीप जोगेश्वर चौधरी असं गुन्हा दाखल झालेल्या वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याच नाव...

- दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. पत्नी तक्रार द्यायला गेली असता, वाडी पोलीस स्टेशन मध्ये जाऊनही गोंधळ घातला

- वाडी पोलिसांत पत्नीच्या तक्रारीवरून प्रदीप चौधरीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- पोलीस कर्मचाऱ्यांनी दारूच्या निषेध गोंधळ घालत चक्क पोलीस आयुक्तांना फोन लावतो, पीआयला निलंबितच करतो अशा पद्धतीची भाषा वापरली..

- पोलीस कर्मचाऱ्यांनीच अशा पद्धतीची गैरवर्तणूक केल्यानंतर चर्चेचा विषय ठरला.

-

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा बर्ड फ्लूने डोके वर काढले; कावळे मरण्याचे प्रमाण वाढले

धाराशिव जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूने पुन्हा एकदा डोकं वर काढल आहे. जिल्ह्यात कावळे मरण्याचे प्रमाण अचानक वाढल्याने नागरिकांत भीती पसरली आहे.काही दिवसांपूर्वी ढोकी परिसरात कावळे मृत अवस्थेत आढळून येत होते.तपासणीनंतर त्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाली असल्याचे उघड झालं होतं.आता पुन्हा कळंब शहर, दहिफळ गावासह जिल्ह्यातील इतर परिसरात कावळ्यांचा अचानक मृत्यू होऊ लागला आहे.आतापर्यंत जिल्ह्यात 50 पेक्षा अधिक कावळ्यांची मृत्यू झाला आहे.कावळ्यात स्थलांतर करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं,हा आजार त्यातून आला आहे.पक्षी बर्ड फ्लू ने बाधित झाला असेल त्यात कावळे संपर्कात आल्याने कावळे मृत अवस्थेत आढळत असल्याचं पशुसंवर्धन विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुटीच्या दिवशीही दस्त नोंदणी सुरू.

मार्च महिन्याअखेरीस दस्त नोंदणीसाठी नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सुटीच्या दिवशीही दस्त नोंदणी कार्यालये खुली ठेवण्याचा निर्णय नोंदणी आणि मुद्रांक विभागाने घेतला आहे. त्यानुसार शनिवार ते सोमवार (२९ ते ३१ मार्च) कार्यालये सुरू राहील, अशी माहिती सहनोंदणी महानिरीक्षक अशोक पाटील यांनी दिली.

दर वर्षी एक एप्रिल रोजी रेडीरेकनरच्या दरात बदल होतो. त्यामुळे मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर दस्त नोंदणी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. यंदा शनिवारी आणि रविवारची सुटी आणि सोमवारी रमजान ईदची सुटी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी तिन्ही दिवशी कार्यालये खुली ठेवण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

Pune Live : साखरेमुळे रेल्वेला ‘गोड’ दिवस..

देशभरात साखर पोहोचविण्यासाठी रेल्वेने महत्त्वाची भूमिका बजावली असून, भरघोस उत्पन्नाच्या माध्यमातून रेल्वेलाही गोड दिवस आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर वाहतुकीमध्ये ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

रेल्वे विभागाला प्रवासी वाहतुकीनंतर सर्वाधिक उत्पन्न मालवाहतुकीतून मिळते. त्यामध्ये प्रामुख्याने साखर, पेट्रोलियम पदार्थ, ऑटोमोबाइल आणि इतर सामग्रीच्या वाहतुकीचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाला मालवाहतुकीतून आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ५०६.८० कोटींचे उद्दिष्ट दिले होते. रेल्वेने फेब्रुवारीअखेर ७५ कोटी (३.४ टक्के) अतिरिक्त महसूल प्राप्त करताना, ५२४.१४ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यापैकी सर्वाधिक ३०६.४१ कोटी रुपयांचे उत्पन्न केवळ साखरेच्या वाहतुकीतून मिळाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

भिवंडीत खाडीतील प्रदूषित पाण्यावर पालेभाज्यांची शेती ; प्रशासनाचे दुर्लक्ष

भिवंडी शहरालगत वाहणाऱ्या कामवारी नदीचे नदीनाका या ठिकाणी खाडीत रूपांतर होत आहे.परंतु या ठिकाणी नजीकच्या शेलार खोणी या ग्रामीण भागासह शहरातील कपड्यावर रंग प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यातील प्रदूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता खादी पात्रता सोडले जात आहे.या प्रदूषित पाण्यावर पालेभाज्यांची शेती पिकवून ती बाजारात हिरवीगार ताजी भाजी म्हणून विक्री केली जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. भिवंडी शहरा नजीक असलेल्या खोणी पुलाच्या शेजारी नदीकिनारी पालक मेथी व माठ अशा पाले भाज्यांची शेती केली जाते. भाडेतत्वावर जमीन घेऊन परप्रांतीय शेतकऱ्यां कडून ही शेती केली जात आहे. या शेतीसाठी कामवारी नदीपात्रात प्रक्रिया न करता सोडलेले डाईंग सायजिंगचे सांडपाणी व नाल्यातील घाण पाण्याने ही शेती केली जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका उत्पन्न होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.परंतु याकडे पालिकेचे पर्यावरण विभाग तसेच प्रदूषण नियंत्रण महामंडळ हे सोयिस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.

अफ्रिकेच्या समुद्र चाच्यांनी अपहरण केलेल्या खलाशांमध्ये रत्नागिरीतील दोन तरुण

आफ्रिकेच्या समुद्रात समुद्री चाच्यांनी एका जहाजावर हल्ला करून अपहरण केलेल्या 10 खलाशांमध्ये रत्नागिरीतील 2 तरुणांचा समावेश आहे..मिरकर समीन जावेद आणि सोलकर रिहान शब्बीर अशी या दोघांची नावं आहेत. आपल्या मुलांना सोडवण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी या मुलांच्या कुटुंबियांनी सरकारकडे केली आहे.

मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील साओ तोमे आणि प्रिन्सिपे बेटाजवळ, सँटो अँटोनियो दो प्रिन्सिपेपासून ४० नॉटिकल मैल आग्नेय दिशेला समुद्री चाच्यांनी या जहाजावर 17 मार्च रोजी हल्ला केला होता. या घटनेत 10 खलाशांचं अपहरण करण्यात आलं असून, त्यापैकी 7 भारतीय आणि 3 रोमानियन आहेत.

यामध्ये मिरकर समीन जावेद आणि सोलकर रिहान शब्बीर हे दोघेही रत्नागिरीचे रहिवासी आहेत.

मागणी नव्या ११० बसेसची, मिळाल्या फक्त २० बसेस

जळगाव एसटी विभागाच्या ताफ्यात बसची संख्या कमी, त्यात अनेक खराब बसेसमधून जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. वर्षाच्या सुरुवातीला राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून विविध विभागांना एसटी बसेस टप्प्याटप्याने देत आहे. जळगाव जिल्ह्यासाठी ११० नव्या बसेसची मागणी महामंडळाने केली होती.केवळ फक्त २० बस मिळाल्या

परिवहनमंत्र्यांनी नव्या वर्षात राज्यातील सर्व जिल्ह्यांना मिळून २ हजार ६४० नव्या बसेस दिल्या जातील, असे सांगितले होते. त्यानुसार काही जिल्ह्यांना बसेस उपलब्ध होत आहेत. जळगाव जिल्ह्याला, फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील मुक्ताईनगराला आधी १० बसेस मिळाल्या. नंतर यावल तालुक्यात आगाराला १० अशा एकून २० बसेस मिळाल्या आहेत.

घराबाहेर पडतांना काळजी घ्या; यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांचे नागरिकांना आवाहन

यवतमाळ जिल्ह्यात दररोज पारा वाढत असल्याने उष्णतेची जाणवत आहेत. पारा 40:8 सेल्सिअस अंश पर्यंत पोहचला आहे. तापमानाचा पारा झपाट्याने वाढतोय.त्यामुळे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असून, उन्हाचा तडाखा अधिकच वाढलाय. उन्हामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

लुटीच्या मालासह दोन आरोपी कळंब येथुन ताब्यात,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळंब पोलिस ठाणे हद्दीतील डिकसळ पाटी जवळ जबरी चोरीतील आरोपींना अटक केली आहे.हे आरोपी पारधी पिढी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने लल्ल्या उर्फ अनिल शिंदे व मिर्च्या उर्फ आकाश काळे यांना ताब्यात घेतले आहे.या दोघांनी पंधरा दिवसापुर्वी डिकसळ पाटी जवळ पती - पत्नीला आडवुन त्यांचे सोन्याचे दागिने लुटल्याचे कबुल केले दरम्यान आरोपीकडुन सोन्याची कर्नफुले,मंगळसूत्र मणी असा 27 हजार रुपये किंमतीचा माल जप्त करुन आरोपींना अटक केली आहे.

संत तुकाराम साखर कारखान्याच्या एकवीस जागांसाठी बावीस उमेदवार रिंगणात

मावळच्या संत तुकाराम सहकारी साखर कारखाना यांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी अखेर माघारीनंतर दोन दिवसांनी जाहीर केली.. या निवडणुकी साठी एकवीस जागांसाठी दोनशे सव्विस नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. त्यापैकी सव्विस नामनिर्देशन पत्रे दुबार निघाली, तर पाच नामंजूर करण्यात आली. त्यामुळे अंतिम टप्प्यात एकशे 95 नामनिर्देशन पत्रे वैध ठरली. नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर एकूण बावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, मात्र संचालक मंडळातील जागांपेक्षा एक अर्ज जास्त राहिल्याने मतदान प्रक्रिया राबविणे भाग पडणार आहे....एकवीस पैकी अठरा जागांवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. मात्र, ऊस उत्पादक गट क्र. एक हिंजवडी,ताथवडे या मतदारसंघात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असल्याने येथे मतदान होणार आहे... विशेष म्हणजे, कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले यांनाच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.

तळेगावात मालमत्ता जप्ती, सिल आणि नळ कनेक्शन खंडित करण्याचा धडाका सुरू

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने कर वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून सरकारी सुट्टीच्या दिवशीही त्यांच्याकडून कर वसुलीचे काम सुरू आहे. एकंदरीत मार्च महिन्याचे टारगेट पूर्ण करण्यासाठी तळेगाव नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी झटून कामाला लागलेले असून ज्या नागरिकांनी कर भरलेला नाही अश्यांच्या मालमत्तेला टाळे ठोकून सील करण्याची काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत नगरपरिषदेच्या कर संकलन विभागाने आत्तापर्यंत पस्तीस मिळकती सील केल्या आहेत. तर आठशे नागरिकांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहे. चार सदनिकांचे नळ जोड खंडित केले आहे. दरम्यान या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत चौदा कोटी बावीस लाख रुपये कर परिषदेच्या तिजोरीत जमा झाला आहे..

आत्महत्येच्या गुन्ह्यातील प्राचार्यांसह 17 जण रजेवर

यवतमाळच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडून देणाऱ्या प्राध्यापक संतोष उर्फ आप्पा गोरे आत्महत्या प्रकरणात गुन्हे दाखल झालेले प्राचार्य, तेरा प्राध्यापक आणि तीन लिपिक रजेवर गेले आहे. त्यामुळे दहाच प्राध्यापक, लिपिक कार्यरत आहे. उन्हाळी परीक्षा तोंडावर असून फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया सुरू असताना अशावेळी महाविद्यालयातील सुमारे एक हजार आठशे विद्यार्थ्यांना अडचणींना समोर जावे लागत आहे.लोकनायक बाबूजी आणे महिला महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक संतोष उर्फ आप्पा गोरे यांनी धामणगाव रेल्वे स्थानकावर मालगाडी खाली येऊन आत्महत्या केली होती. बडनेरा रेल्वे पोलिसांनी सुसाईड नोट आणि तक्रारीवरून 34 जणांवर गुन्हे दाखल केले आहे.

उल्हासनगरात सोसायटीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरली!

उल्हासनगरात सोसायटीच्या पार्किंगमधून बर्गमॅन स्कुटर चोरल्याची घटना घडली आहे. कॅम्प ४ मधील साई प्रेरणा अपार्टमेंटमधली ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. साई प्रेरणा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुनील कारीरा यांनी रात्री त्यांची बर्गमॅन स्कुटर पार्किंगमध्ये उभी केली होती. रात्री एका चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. आपला चेहरा कॅमेरात दिसू नये, यासाठी त्याने तोंडाला रुमाल बांधून ही चोरी केली. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Pune : सलग ५१ लावणी गीते सादर करून पुष्पा चौधरी यांचा विश्वविक्रम

पुणे : मराठी लावणी संगीत जगाच्या पटलावर यावी आणि लावणीला समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अभिनेत्री व गायिका पुष्पा चौधरी यांनी सलग ५१ मराठी पारंपारिक लावणी गायनाचा विश्वविक्रम केला आहे. सलग ४ तास ४५ मिनिटे पुष्पा चौधरी यांनी लावणीची गाणी सादर करून विश्वविक्रम केला.

Pune Crime : अज्ञाताचे मुलींकडे पाहून अश्लील कृत्य; गुन्हा दाखल...

रात्री जेवायला जात असलेल्या तीन मुलींकडे पाहून एका अज्ञात व्यक्तीने अश्लील कृत्य केल्याची घटना मंगळवारी रात्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घडली. या प्रकाराबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करून गुरुवारी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर ठिय्या आंदोलन केले. अखेर विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.

पीडित विद्यार्थिनींनी लगेच त्याबाबत सुरक्षा रक्षकांना कल्पना दिली. मात्र सुरक्षारक्षकाने त्वरित प्रतिसाद न दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com