
राज्यात सध्या मराठी भाषेचा मुद्दा तापलेला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्याच विधानाने नव्या वादाला तोंड फोडलंय. पुण्यातील कोंढवा कन्व्हेंशन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत, शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी 'जय हिंद, जय महाराष्ट्र' म्हणत भाषण संपवलं. मात्र त्यानंतर'जय गुजरात' अशी घोषणा केली. शिंदेंच्या या घोषणानंतर मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिंदेंच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी दिलेल्या घोषणेवर राजकीय वर्तुळातील नेत्यांनी शिदेंवर टीकेची तोफ डागली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदेंवर टीका केली. 'शिंदेसाहेबांसोबत नेमकं कसं बोलायचं? केम छो एकनाथ साहेब', असं म्हणत आव्हाडांनी शिंदेंना डिवचलं. तसेच 'शिवसेना मराठी माणसासाठी उभी केली होती. यासगळ्यानंतर एकच म्हणावं वाटतं, विनाश काले विपरीत बुद्धी', असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
एकनाथ शिंदेंनी केलेल्या घोषणेनंतर मनसे नेते मनोज चव्हाण यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे, 'आज महाराष्ट्रात खरी लाचारी काय असते, ते पाहायला मिळालं. राज्याचे उपमुख्यमंत्री जर फक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना खुश करण्यासाठी जय गुजरात म्हणत असतील, तर हा फक्त एक नारा नाही, हा थेट महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान आहे', असं मनोज चव्हाण म्हणाले.
'उपमुख्यमंत्र्यांनी काहीही बोलण्याआधी विचार करायला हवा. महाराष्ट्रात राहून, इथल्या जनतेने निवडून दिलेल्या नेत्याने जय गुजरात म्हणणं हे या भूमीचा अपमान आहे. ही लाचारी कोणत्या लेव्हलला चालली आहे, हे आता दिसून येत आहे', असंही यावेळी ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.