अक्षय शिंदे
जालना : जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याची पाळेमुळे अजूनही वाढत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे राज्यात गाजत असलेल्या या घोटाळ्यात आता जालना जिल्ह्यासह बुलढाणा आणि बीड जिल्ह्यातील खातेदारांना नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात आली आहे. अर्थात या खातेदारांचा जबाब घेऊन साक्षीदार करण्याची प्रशासनाची तयारी सुरु आहे.
जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या बदल्यात शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात आलेल्या अतिवृष्टी अनुदान रक्कमेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. साधारण २५ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राज्यभरात गाजलेल्या या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत २८ कर्मचाऱ्यांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून काही कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.
आता खातेदारांना नोटिसा
दरम्यान तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांनी जालनासह बुलढाणा, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील मित्र, नातेवाईकांची नावे अनुदान यादीत समाविष्ट करत त्यांना लाखो रुपयांचा आर्थिक लाभ मिळवून दिल्याचे समोर आले आहे. चौकशी समितीने ही संख्या १४ हजार ५०० असल्याचे सांगितले असून यात शंभरहून अधिक बँक खातेदार जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे अशा खातेदारांना आर्थिक गुन्हे शाखेकडून जबाबासाठी नोटिसा बजावल्या जात आहेत.
अधिक वेळा अनुदान लाटणाऱ्यांना सहआरोपी
यात आरोपींच्या सांगण्यावरून किंवा तांत्रिक कारणामुळे अनुदान घेतलेल्यांना साक्षीदार तर दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा अनुदान लाटणाऱ्यांना थेट सहआरोपी करणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी २८ कर्मचारी अधिकाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता खातेदारांना नोटीस बजावून त्यांचे जबाब घेऊन साक्षीदार केले जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.