
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा यापूर्वीही अनेकदा झाल्या. प्रत्येकवेळी एक तर जयंत पाटील स्वतः स्पष्टीकरण देऊन चर्चांना पूर्णविराम देतात, तर काही वेळा भाजपमधील नेते याबाबतच्या बातम्यांचं खडन करतात. यावेळीही त्याचीच पुनरावृत्ती झाली. जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेची लाट आली. यावेळी तर दोन्हीही नेत्यांनी या भेटीमागील नेमकं कारण सांगून लाट थोपवण्याचा प्रयत्न केला.
दोन राजकीय पक्षांमधील दोन नेते जेव्हा भेट घेतात तेव्हा चर्चा होतेच. आताही तसंच घडलं. जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली. त्यामुळं पुन्हा राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या. या राजकीय चर्चेला भरती आली. पण ओहोटीआधीच दोन्हीही नेत्यांनी भेटीमागचं कारण सांगून ती थांबवण्याचा प्रयत्न केला.
जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीनंतर त्यात नेमकं काय झालं? कशावर चर्चा झाली? काही राजकीय चर्चा झाली का? अशा एक ना अनेक प्रश्नांचं वादळ राजकारणाभोवती फिरू लागलं. या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध सुरू झाला. त्याआधीच जयंत पाटील यांनी या भेटीत काय घडलं हे सांगितलं.
जयंत पाटील म्हणाले की, काल संध्याकाळी ७.५० वाजता बावनकुळेंच्या घरी मी भेट घेतली. सांगलीतील काही महसूलबाबतच्या प्रश्नांवर मी १० ते १२ निवेदनं दिली. महसूल विभागात ७/ १२ संगणकीकरण केलं, ऑनलाइन केलं. पण दुरुस्त्या वेळेवर होत नाहीत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रश्न होता. त्याकडे लक्ष वेधलं. त्याचबरोबर अनेक जमिनी संपादनाच्या नोटिसा दिल्या आहेत. संपादन पण झालं नाही, मोबदलाही दिला नाही. ते प्रश्न घेऊन भेट घेतली. २५ मिनिटं चर्चा झाली. राजकीय चर्चा नाही. राधाकृष्ण विखे पाटील देखील होते. माझ्यासोबत शिष्टमंडळही होते, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
कुठलीही राजकीय चर्चा नाही - बावनकुळे
जयंत पाटील यांच्यासोबतच्या भेटीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही स्पष्टीकरण दिलं. जयंत पाटील काल सांगली जिल्हा आणि त्यांच्या जिल्ह्यातील महसुली खात्याशी संबंधित काही विषय घेऊन भेट घेण्यासाठी आले होते. विखे पाटीलही सोबत होते. 14 ते 15 विषय महसूल विभागाशी संबंधित असल्यानं ही भेट झाली, असे बावनकुळे यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्याच्या विकासकामांबद्दल त्यांनी चर्चा केली. अधिवेशनात या 14 समस्यांसंदर्भात माझ्या दालनात बैठक घेऊन विषय सोडवणार आहे, असे आश्वासन त्यांना मी दिले. काल माझ्या बंगल्यावर ही भेट झाली. तेव्हा ४०० ते ५०० लोक त्या ठिकाणी होते. ही राजकीय भेट नव्हती. कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. विकासकामांची चर्चा झाली. मी जयंत पाटील यांच्या राजकीय भवितव्याबद्दल बोलावं एवढा मोठा नाही, असंही बावनकुळे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.