Raj Thackeray: हेच औदार्य दाखवावं; बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्यावा...' राज ठाकरेंची मोदी सरकारकडे मोठी मागणी
Raj Thackeray News:
केंद्र सरकारकडून माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पी. व्ही. नरसिंह राव तसेच शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून याबाबतची घोषणा करण्यात आली. याआधी काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता. यावर प्रतिक्रिया देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
काय म्हणालेत राज ठाकरे?
"माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो."
"बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं, अशी मोठी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
माझ्यासारख्या अनेकांसाठी तो आनंदाचा क्षण...
"देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल," असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.