
Nagpur-Goa Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला राज्य सरकारने नुकताच हिरवा कंदील दाखवला. पण या प्रकल्पाला कोल्हापूर, सांगली येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता. यात आता नांदेडचीही भर पडली आहे. त्याशिवाय भाजपच्या खासदारानेही या महामार्गाल विरोध दर्शवलाय. शक्तीपीठ महामार्गाला माझा विरोध आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पर्यायी मार्ग काढावा, असे वक्तव्य भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी केलेय. शक्तीपीठ हा महामार्ग पवनार, वर्धा येथून सुरू होणार असून पत्रादेवी, गोवा येथे संपणार आहे.
शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. वर्धा ते गोवा असा हा महामार्ग असून या महामार्गामध्ये 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत. शक्तीपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसह १२ जिल्ह्यांमधून जाणार आहे.
अशोक चव्हाण काय म्हणाले ?
शेतकऱ्यांच्या कुठल्याही हिताचा हा महामार्ग नसल्याने या महामार्गाला शेतकरी विरोध करत आहेत. नांदेडमधून देखील हा महामार्ग जात असून या महामार्गाला नांदेड जिल्ह्यातील शेतकरी विरोध करीत आहेत. शक्तीपीठ महामार्गाला पूर्वीही विरोध होता आणि आता ही माझा विरोध आहे. मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांना भेटून यातून पर्यायी मार्ग काढता येईल का? हे पाहावे लागणार असल्याचे मत भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.
दरम्यान नांदेडचा बीड होऊ द्यायचा नसेल तर मुंडे बंधू आणि भगिनींना नांदेडचे पालकमंत्री पद देऊ नये अशी भूमिका मराठा समन्वयकाने घेतली आहे. यावर खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलीय. मागण्या अनेक होत असतात,लोकांची मतं असतात, शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्री जे ठरवतील तेच नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री होतील अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गाला विरोध, 24 जानेवारीला होणार राज्यव्यापी आंदोलन
वर्धा ते गोवा जाणारा शक्तीपीठ महामार्ग राज्यातील बारा जिल्ह्यातून जात असून यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत, जवळपास 800 किलोमीटर लांबीचा होत असलेला हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या कोणत्याही उपयोगाचा नसल्याने या महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथे शेतकऱ्यांनी बैठक घेऊन या महामार्गाला विरोध केला. प्रचंड घोषणाबाजी करत शासनाचा निषेध या शेतकऱ्यांनी केला आहे. जमिनीपासून 30 ते 40 फूट उंच हा मार्ग होणार आहे. महामार्ग होत असताना जमिनीची नासधूस होऊन जमिनीचा कस कमी होण्याची शक्यता असल्यामुळे, व बागायतदार शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा या प्रकल्पात जात असल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचेही शेतकरी सांगतात. कुठलीही गरज नसताना शक्तीपीठ महामार्ग कशासाठी शेतकऱ्यांच्या तोंडचा घास काढून घेण्याचा हा घाट असल्याचा आरोप शेतकरी करतायेत. त्यामुळे फक्त कोल्हापूरच नव्हे तर राज्यातील बारा जिल्ह्यातून या महामार्गाला विरोध होत आहे येत्या 24 जानेवारीपासून शेतकऱ्यांचे मोठं आंदोलन सुरू होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.