बालाजी सुरवसे
धाराशिव : अगोदरच सोयाबिनला चांगला भाव नसल्याने शेतकरी हतबल झालेला होता. तर कष्ठाने पिकविलेल्या सोयाबीनची विक्री केल्यानंतर व्यापाऱ्यांकडून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्याकडून खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे न देता व्यापारी पसार झाले आहेत. यात साधारण ३० लाख रुपयांची फसवणूक व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना फसवणारी व्यापाऱ्यांची टोळी सक्रिय झाली आहे. थेट गावात जात शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला जातो. मात्र त्यांना त्याचे पैसे दिले जात नाही. कळंब व वाशी तालुक्यातूनही असाच प्रकार समोर आला आहे. यापूर्वी कळंब तालुक्यात सदरचा प्रकार घडल्यानंतर वाशी तालुक्यात देखील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. बार्शी येथील व्यापाऱ्यांनी सोयाबीन खरेदी करून पैसे न दिल्याची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वर्षभरापासून दिले नाही पैसे
धाराशिवमधील कळंब पाठोपाठ वाशी तालुक्यात देखील फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. वाशी तालुक्यातील सोनारवाडी येथील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून बार्शी येथील व्यापारी संदीप भाऊराव मोरे, मन्नत रामलिंग तोडकरी आणि रवी घरबुडवे यांनी सोयाबीन खरेदी केली. शेतकऱ्यांनी विश्वासावर सोयाबीन व्यापाऱ्याला विक्री केला. मात्र वर्षभरानंतरही पैसे दिले नाहीत.
पोलिसांकडून कोणतीही कार्यवाही नाही
वाशी तालुक्यातील सोनारवाडी येथील आठ ते दहा शेतकऱ्यांची 25 ते 30 लाखांची फसवणूक झाली आहे. शेतकऱ्यांकडून वारंवार मागणी करून देखील व्यापारी पैसे देत नाहीत. यामुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. मात्र पोलिसांकडून अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.