Devendra Fadnavis: कल्याणच्या घटनेचं सभागृहात पडसाद, मुजोर कर्मचाऱ्याचं तात्काळ निलंबन; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Devendra Fadnavis: 'मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचा होता, आहे आणि राहणार. काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात. माज आल्यासारखं करतात. अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही' - देवेंद्र फडणवीस
devendra fadnavis on kalyan news
Devendra FadnavisSaam Tv
Published On

Devendra Fadnavis on Kalyan News: कल्याणच्या योगीधाम परिसरात अजमेरा सोसायटीत एका मराठी माणसाला मारहाणीचा मुद्दा सभागृहात चांगलाच पेटला. याप्रकरणात विरोधकांकडून प्रश्न विचारण्यात येत आहे. राज्यात भाजपचं सरकार आल्यापासून मराठी माणसांवर अन्यायाच्या घटना वाढल्यात का? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. दरम्यान , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रत्युत्तर दिलं.

अखिलेश शुक्ला आणि पत्नीवर गुन्हा दाखल

कल्याण मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, 'विरोधी पक्षाच्या सदस्यांनी म्हत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय. अखिलेश शुक्ला आणि त्याची पत्नीनं भांडणामध्ये मराठी माणसाला अपमानीत होईल असे उद्गार काढले. ज्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट तयार झाली. अखिलेश शुक्ला एमटीडीसीचा कर्मचारी आहे. त्याच्या आणि त्याच्या पत्नीवर एफआयआरची नोंद करण्यात आलीय. त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. तसेच पुढील तपास पोलीस करीत आहेत.'

'मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचा होता, आहे आणि राहणार. कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात. माज आल्यासारखं करतात. अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही'. असं देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं.

भाजप सत्तेत आल्यापासून मराठी माणसांवर अन्यायाच्या घटना वाढत असल्याचा आरोप काही विरोधकांनी केला. त्यावर प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री म्हणाले, 'भाजपचं सरकार आलं म्हणून हे झालं असा राजकीय रंग देण्याचं काही कारण नव्हतं. आपल्याला याचाही विचार करावा लागेल की मुंबईतील माणूस हद्दपार का झाला? कुणाच्या काळात झाला? का त्या माणसाला ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, याच्या पलिकडे जावं लागलं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

devendra fadnavis on kalyan news
Devendra Fadanavis: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात SIT चौकशी होणार, कुटुंबीयांना १० लाखांची मदत - मुख्यमंत्री

मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी

'आपण मान्य केलं पाहिजे मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. देशभरातली लोक इथं येतात. मुंबईत तीन - चार पिढ्यांपासून राहणारा उत्तर प्रदेशच्या एखाद्या जिल्ह्यातून आलेला व्यक्ती उत्तम मराठी बोलतो. आपले सणवार साजरा करतो. गणपती सारखा सण साजरा करताना, तो व्यक्ती उत्तर भारतीय आहे की मराठी असा प्रश्न पडतो. मात्र काही जण माजुरडेपाणाने बोलतात. यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला गालबोट लागतं.'

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, 'विधानपरिषदेच्या माध्यमातून मराठी माणसाचा आवाज म्हणून आज मी ठणकावून सांगतो. कुठल्याही परिस्थित मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही. असं मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com