
नागपूर : परभणीत एका माथेफिरूने संविधान शिल्पाची विंटबना केली. या प्रकारानंतर संविधानप्रेमींमध्ये उद्रेक पाहायला मिळाला. विटंबनेच्या प्रकारानंतर संविधानप्रेमींनी आंदोलन केलं. तसेच यावेळी काहींनी सार्वजनिक मालमत्तेचीही तोडफोड केली. या प्रकारानंतर पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला. तर काहींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यापैकी एका तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर परभणीमधील वातावरण तापलं आहे. या संपूर्ण प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 'ती बाब डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही मंजूर झाली नसती, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी प्रकरणावर दिली.
नागपुरातील राजभवनात महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी झाला. या शपविधीनंतर मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी परभणीच्या घटनेवर भाष्य केलं. 'परभणीची घटना आहे, त्यात एका मनोरुग्णाने भारताच्या संविधानाचा अपमान केला. त्याला अटक देखील करण्यात आली. या प्रकारानंतर दुर्दैवाने उद्रेक झाला. मला या निमित्ताने विनंती करायची आहे की, एका मनोरुग्णाच्या कृत्यावर असंवैधानिक पद्धतीने उद्रेक करणे योग्य नाही'.
'ते बाबासाहेब आंबेडकरांनाही मंजूर झालं नसतं. ती घटना घडून चुकली आहे. हे सरकार संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारं सरकार आहे. आम्ही तसूभर संविधानापेक्षा वेगळं काम करणार नाही. आम्ही सगळ्यांनी संविधानाची शपथ घेतली, त्यानुसारच आम्ही काम करू. हे सरकार संविधानाचा गौरव करेल, हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो, असे ते पुढे म्हणाले.
बीडमध्ये सरंपचाची हत्या झाली. यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, 'बीडमध्ये सरंपचाची निर्घृण हत्या झाली. या प्रकरणात काही लोकांवर कारवाई केली आहे. काहींना निलंबित केलं आहे. तीन आरोपी सापडले आहेत. इतर आरोपीही सापडतील. ही केस सीआयडीला दिली आहे. आम्ही विशेष एसआयटी नेमून चौकशी करणार आहोत. आरोपी कोणीही असो, आम्ही त्याला सोडणार नाही. आम्ही सर्व प्रकरण गांभीर्याने घेतो. या प्रकरणाचे सर्व धागेदोरे शोधण्याचे काम करू'.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवरही भाष्य केलं. 'विरोधकांनी दोन-तीन मुद्दे उपस्थित केले आहेत. त्याचं उत्तर सभागृहात निश्चितपणे देऊ. मी आज एवढंच सांगतो की, आमच्या सर्व प्रकारच्या चर्चेची तयारी आहे. विरोधकांनी चर्चा करावी. विरोधकांचा आवाज दाबणार नाही. आम्ही चर्चेपासून मागे हटणार नाही. लोकसभेप्रमाणे चर्चा न करता पळ काढायचा. माध्यमांवर फक्त बोलायचं. हे लोकशाही विरोधी आहे. सभागृहात बोलायचं नाही, फक्त माध्यमांवर बोलायचं. तर त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. त्यांचे सर्व प्रश्नांचे उत्तर देऊ, असे फडणवीस म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.