CM Eknath Shinde - Chandrayaan 3 : भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे चांद्रयान ३ चे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे. या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या. तसेच यावेळी त्यांनी भारतीयांचं आणि शास्त्रज्ज्ञांचं अभिनंदन केले.
भारताच्या चांद्रयान ३ चे विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या. इस्त्रोच्या कमांड सेंटरमधून सुरू असलेले प्रक्षेपण वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी पाहिले. मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सर्वानीच आनंदाने टाळ्या वाजवून ही मोहीम फत्ते झाल्याबद्धल आनंद साजरा केला. तसेच उपस्थितांना पेढेही वाटण्यात आले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा आजचा क्षण आहे. या यशाने सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. देशातील सर्व शास्त्रज्ज्ञ, तंत्रज्ज्ञ, संशोधकांचं हे यश आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दिशादर्शक नेतृत्वाचं आणि पाठिंब्याचं बळ शास्त्रज्ज्ञांच्या पाठीशी आहे. श्रीहरीकोटा येथून १४ जुलैला ‘चांद्रयान ३’ हे चंद्राच्या दिशेने झेपावलं. अनेक अवघड टप्पे त्याने यशस्वीपणे पार केले. चांद्रयान ३’ कडून वेळोवेळी पाठवण्यात आलेली छायाचित्रे आणि यानाची सकारात्मक प्रगती ही आजच्या या यशाची ग्वाही देत होते, असेही ते म्हणाले.
शिंदे म्हणाले की, भारतीयांना असलेली यशाची खात्री आणि शास्त्रज्ज्ञांचे कर्तृत्व आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरील अढळ विश्वास आज सार्थ ठरला आहे. आज ‘चांद्रयान ३’ चे यश हे संपूर्ण जगात उजळून निघाले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.