बुलढाणा : राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी न देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. यातच सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार शेकडो शेतकऱ्यांनी पोलिसात दिली आहे. यामुळे राज्य सरकारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बुलढाण्याच्या अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये शेकडो शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
विधानसभा निवडणुकी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा नारा देत घोषणा केली होती. त्यानुसार त्यांना आम्ही शेतकऱ्यांनी मतदान करून निवडून दिले आहे. मात्र आता सत्ता हातात मिळाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकत नाही, असे वक्तव्य करत कर्ज भरायला सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाला आहे.
शेतकऱ्यांमध्ये नाराजी
शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार अशी घोषणा करत राज्यात सत्ता मिळविली. सत्ता मिळाल्यानंतर कर्जमाफी देता येणार नसल्याचे जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफीच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांमध्ये राज्य सरकारबाबत तीव्र नाराजी आहे. याचे पडसाद राज्यात उमटत असून वाशिममध्ये कर्जफेडीसाठी शेतकऱ्याने अवयव विक्रीला काढले. तर नांदेड जिल्ह्यात जिवंत समाधी आंदोलन करण्यात आले. यानंतर थेट सरकारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बुलढाण्यात शेतकरी आक्रमक झाले आहेत.
पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या
दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये आज शेकडो शेतकरी जमले असून या शेतकऱ्यांनी सरकारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे. सरकारवर फसवणूकसह शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत उठणार नाही; अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.