भाजप नेते नारायण राणे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद काही नवा नाही. दोन्ही नेत्यांमधील वैर सर्वश्रूत आहे. नारायण राणे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून केली होती. बाळासाहेबांचे फायरब्रँड नेते म्हणून त्यांची शिवसेनेत ओळख होती. मात्र, त्यानंतर ते नाराज होऊन काँग्रेसमध्ये गेले.
केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर नारायण राणे (Narayan Rane) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी मंत्रीपद देखील मिळवलं. नारायण राणेंकडून वारंवार उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जातं. तसेच ते ठाकरेंबाबत काही खळबळजनक दावे देखील करतात. आता नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंबाबत आणखी एक खळबळजनक दावा केला आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नाराज होऊन मातोश्रीतून दोन वेळा पळून गेले होते. मात्र, मीच त्यांची मनधरणी करून त्यांना परत आणलं, असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी केला आहे. मी बोलतो ते असत्य असेल, तर उद्धव ठाकरे यांनीच सांगावं, असं आव्हान देखील राणेंनी दिलं आहे. ते रत्नागिरी येथील सभेत बोलत होते.
"उद्धव ठाकरे यांनी आयुष्यात सर्वात जास्त त्रास बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना दिला आहे. दोन वेळा उद्धव मातोश्री सोडून बायको आणि मुलांसह अंधेरीला पळून गेले होते. तेव्हा बाळासाहेब त्यांना घरात घ्यायला तयार नव्हते. त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना मी त्यांना फोन केला".
"मनोहर जोशी यांना मी सर असं म्हणायचो, मी त्यांना म्हणाले साहेबांना (बाळासाहेब ठाकरे यांना) सांगा की उद्धव ठाकरेंना घरात घ्या. तेव्हा मनोहर जोशी मला म्हणाले, मी जाऊन आलो पण ते माझं ऐकत नाही. तूच त्यांच्याकडे जा. त्यावेळी मी बाळासाहेबांना सहज फोन केला", असं राणे म्हणाले.
"बाळासाहेबांनी माझा फोन उचलल्यानंतर मी त्यांना म्हटलं, की साहेब मला भेटायचं आहे. त्यावेळी ते मला म्हणाले काय बोलायचं ते फोनवर सांग. परंतु मी म्हणालो की मला यायचंच आहे. तेव्हा बाळासाहेब मला म्हणाले, नारायण माझ्या घरचा विषय काढायचा नाही"
"तेव्हा त्यांचे आणि माझे खूप जवळचे संबंध होते. मी बाळासाहेबांना भेटायला गेल्यावर म्हणालो, साहेब तुम्ही उद्धव ठाकरे यांना माफ करा. तुम्ही त्यांचे वडील आहात, अर्ध्या तास मी विनंती केल्यानंतर बाळासाहेबांनी माझं ऐकलं आणि उद्धवला घेऊन ये असं म्हणाले. तेव्हा मी अंधेरीत गेलो आणि उद्धवला परत आणलं. असं दोनवेळा घडलं, असा दावा नारायण राणेंनी केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.