
मुंबईत काल, गुरुवारी रात्री उशिरा पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रे खेरवाडी परिसरात भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यात २१ वर्षांच्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चार जणांना अटक केली आहे.
चारही जण मुंबईच्या दिशेने कारने जात होते. त्यावेळी खेरवाडी परिसरात हा अपघात झाला. रात्री उशिरा ते बोरिवलीकडून मुंबईच्या दिशेने निघाले होते. याचदरम्यान हा अपघात घडला आहे. अपघातात मानव विनोद पटेल, हर्ष आशिष मकवाना या दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी कारचा चालक सिद्धेश बेलकर, अवनीश अरूण कुमार मौर्य, ओम नागवेकर, प्रशांत यादव या चौघांना अटक केली आहे.
यानंतर, पोलिसांनी चारही आरोपींचे रक्ताचे नमुने घेतले असून तपासणीसाठी पाठवले आहे. तरुणांनी मद्यपान केले होते का हे तपासणी अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. आरोपी एका बांधकाम व्यावसायिकाच्या कुटुंबातील असल्यामुळे पोलीस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा मृत तरुणांच्या नातेवाईकांचा आरोप आहे.
तरुणांचे मृतदेह विच्छेदनासाठी विलेपार्ले पश्चिमेकडील महापालिकेच्या कृपा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तरुणांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाणे आणि रुग्णालय परिसरात संताप व्यक्त केला. आरोपी दारूच्या नशेत असल्याचा तरुणांच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.