संजय सूर्यवंशी, नांदेड
राज्यभरातील सर्व जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढू लागला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. या कडक उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागले आहेत. तर नांदेडमधील तापमान 41 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलं आहे. या कडक उन्हामुळे नांदेडमध्ये पहिला बळी गेला आहे. नांदेडमध्ये उष्माघातामुळे ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
नांदेडच्या हिमायतनगर शहरात परमेश्वर सुरजवाड हा राहत होता. परमेश्वर कामासाठी दिवसभर घराबाहेर पडला होता. त्यानंतर उन्हातून काम करून सायंकाळी घरी आला. घरी आल्यावर परमेश्वरची तब्येत अचानक खालावली. त्यानंतर रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या तरुणाच्या मृत्यू झाल्याने हिमायतनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, उन्हाचा पारा वाढत ४० पार गेल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. तर तापमानाचा पारा वाढून उष्माघाताच्या रुग्णाची वाढ होत असल्याने सरकारची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. तर वयोवृद्धांना विशेष काळजी घेण्याच आवाहन करण्यात येत आहे. उष्माघात झाल्यास तात्काळ जवळच्या रुग्णलयात जाऊन उपचार घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
प्रौढ्य व्यक्तीच्या शरीराचं तापमान १०४ फॅरनहाईटपर्यंत अर्थात ४० डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने उष्माघाताचा त्रास जाणवतो. उष्माघाताचा त्रासामध्ये तीव्र डोकेदुखी, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे या सारखी लक्षणे दिसून येतात.
उष्माघातात लहान मुलांकडून आहार घेण्यास नकार दिला जातो. तसेच त्यांची चिडचिड होते. त्याचबरोबर लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, तोंडाची त्वचा कोरडी होणे यांसारखी लक्षणे पाहायला मिळतात.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.