पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते वादळी सभा घेत आहेत. आज मोदींनी सोलापुरातील माळशिरस येथे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
"माढ्यात पाणी देणार असं आश्वासन १५ वर्षांपूर्वी एका नेत्याने दिलं होतं. यासाठी त्यांनी मावळत्या सूर्याची शपथ देखील घेतली. पण तो नेता अजूनही या भागात पाणी पोहचू शकला नाही. म्हणूनच या नेत्याची इथून निवडणूक लढवण्याची हिंमत नाही", अशी टीका नाव न घेता मोदींनी शरद पवारांवर (Sharad Pawar) केली.
पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. स्टेजवर येताच त्यांनी येळकोट येळकोट जय मल्हार, बाळूमामांच्या नावाने चांगभलं. हर हर महादेव, असा जयघोष मोदींनी केला. तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत विठ्ठल रुख्मिणी आणि माढेश्वरीला नमन देखील केलं.
"ही वारकरी संप्रदायाची भूमी असून मी विकसित भारतासाठी आपले आशिर्वाद मागण्यांसाठी आलो आहे. मी कोणत्याही सभेला वेळेआधीच पोहचतो. मी कायम आपल्या सेवेत राहणार असून काँग्रेसने जे ६० वर्षात केलं नाही, ते भाजप सरकारने १० वर्षात करून दाखवलं आहे", असं मोदी म्हणाले.
"आम्ही २५ कोटी लोकांना गरिबीतून मुक्त केलं. जवळपास ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिलं. देशातील विकासकामे मोठ्या जोमात सुरू आहे. याचं पुण्य माझं नाही, तर माझं नाही, तर मला निवडून देणाऱ्या लोकांचं आहे", असंही मोदी म्हणाले.
पायाभूत सुविधांवर काँग्रेसने ६० वर्षात जेवढा निधी खर्च केला, तेवढा निधी आम्ही १० वर्षात खर्च केल्याचं मोदींनी म्हटलं. माढ्यात पाणी देणार असं आश्वासन १५ वर्षांपूर्वी एका नेत्याने दिलं होतं. यासाठी त्यांनी मावळत्या सूर्याची शपथ देखील घेतली. पण तो नेता अजूनही या भागात पाणी पोहचू शकला नाही, अशी टीकाही मोदींनी केली.
सिंचनाची कामे आम्ही वेगाने पूर्ण करतोय. अनेक वर्षांपासून रडखडलेला निळवंडे प्रकल्प आम्ही पूर्ण केला. महाविकास आघाडीचे नेते शेतकऱ्यांविषयी मोठमोठ्या गोष्टी करतात. २०१४ पूर्वी देशात काय परिस्थिती होती हे सर्वांनाच माहिती आहे, असं मोदी म्हणाले.
देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सहकार मजबूत करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. येणाऱ्या पाच वर्षात पाच लाख सहकारी संस्थांचे जाळे तयार करणार, कांदा, टोमॅटो उत्पादकांना मदत करणार, असे आश्वासन देखील मोदींनी माढ्यातील मतदारांना दिलं.
साखर कारखान्यांना दहा हजार कोटींची मदत केली. साखर कारखान्यांचा इन्कम टॅक्स माफ केला. यांचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला. आम्ही गेल्या १० वर्षात २० लाख कोटींची शेतमालांची खरेदी केली. शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेतून ३ लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत केली, असा विकासाकामांचा पाढा देखील मोदींनी केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.