ही कहाणी आहे एका यशस्वी उद्योजिकेची. सहा वर्षांपूर्वी पतीचं निधन झालं. एकटी पडली. हतबल झाली. हा धक्का पचवून आयुष्याचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न करू लागली. कोरोना महामारीच्या काळात ती सॅनिटायझर विकून मुलींचा सांभाळ करू लागली. जिद्द काही स्वस्थ बसू देत नव्हती. तिनं स्वतःच्या हिंमतीवर पेपर बॅगचा उद्योग सुरू केला. प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर ती यशस्वी उद्योजिका झालीय. पडत्या काळात स्वतःचं कुटुंब सावरलंच, पण आता ७० कुटुंबांचा ती आधार बनलीय.
उत्तर प्रदेशमधील शाहजहानपूर जिल्ह्यात राहणाऱ्या रचना प्रशांत मोहन यांच्या पतीचं निधन झालं. पतीच्या मृत्यूनंतर न डगमगता त्यांनी जिद्दीने स्वतःचा उद्योग उभारला. आज त्या जवळपास ७० लोकांच्या कुटुंबाचा आधार बनल्या आहेत. कोरोनाच्या काळात सॅनिटाइजर विकून त्यांनी मुलांचे पालनपोषण केले. त्यानंतर धाडसाने स्वतःचा कागदी पिशव्यांचा व्यवसाय सुरू केला आहे.
कृष्णानगर येशील रहिवासी रचना प्रशांत मोहन यांना पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळाले. या रक्कमेतून त्यांनी कागदी पिशव्यांचा उद्योग सुरू केला. त्यांनी शाहजहानपूरमध्ये स्वतःचे पेपर बॅग तयार उत्पादक युनिट स्थापन केले. यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ शकला.
मेहनत आणि जिद्द
२०१७ मध्ये रचना यांचे पती प्रशांत मोहन यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांची आर्थिक परिस्थितीही बिकट झाली. पतीच्या दुःखात असतानाच नातेवाईकांनीही पाठ फिरवली. घरही सोडण्यास भाग पाडले.
पतीच्या मृत्यूनंतर संकटांनी सर्व बाजूंनी घेरलं. त्या अगदी खचून गेल्या. नोकरीच्या शोधात त्या घरोघरी भटकल्या. परंतु त्यांना कोणतेही काम मिळाले नाही. त्यामुळे मुलांचा सांभाळ कसा करावा हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न होता.
एकापाठोपाठ एक संकटे येत असताना कोविड-१९ ने थैमान घातले. त्याकाळात त्यांच्या आईच्या साथीने त्यांनी कसेबसे दिवस ढकलले. कोविड-१९ च्या काळात त्यांनी सॅनिटाइजर विकायला सुरूवात केली. कोविडच्या काळात सॅनिटाइजरची मागणी खूप होती. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्यांना २५ लाखांचे कर्ज मिळाले. या पैशांच्या मदतीने त्यांनी कागदी पिशवी निर्मितीचा व्यवसाय सुरू केला.
प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कागदी पिशवी लोकप्रिय करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने त्यांना पाठिंबा दिला. रचनाच्या कारखान्यात खूप लोक काम करतात. महिला पाकीटं घरी घेऊन जातात. लिफाफे बनवतात. हँडल बनवतात. यातून महिला रोज ४०० रुपयांपर्यंत कमाई करतात.
'आम्ही सर्व आकाराच्या आणि दर्जाच्या कागदी पिशव्या तयार करतो, ज्या शाहजहानपूर आणि आजूबाजूच्या सहा जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या भागांना पुरवल्या जातात. सध्या माझ्यासोबत जवळपास ७० लोक काम करत आहेत, ज्यात बहुतांश महिला आहेत', असं रचना यांनी सांगितलं.
रचनाच्या या जिद्दीचं जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक महाव्यवस्थापक अरुणकुमार पांडे यांनी कौतुक केले आहे. 'प्रशासनाने रचना यांना पंतप्रधान रोजगार योजनेंतर्गत २५ लाख रुपये दिले होते, ज्याचा तिने चांगला उपयोग करून अनेकांना रोजगारही उपलब्ध करून दिला. रचनाची कथा खरोखरच लोकांसाठी, विशेषत: तरुणांसाठी प्रेरणादायी आहे, जे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत,' असं त्यांनी सांगितलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.