

गर्भधारणा आणि प्रसूती हा महिलेच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात शरीरातील प्रतिकारशक्ती आणि इतर शारीरिक बदलांमुळे संसर्गाचा धोका वाढतो. अशा संसर्गांकडे दुर्लक्ष केल्यास किंवा वेळीच उपचार न घेतल्यास मॅटर्नल सेप्सिस (Maternal Sepsis) सारखी गंभीर अवस्था निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर १० ते १६ मे दरम्यान ‘मॅटर्नल सेप्सिस जनजागृती सप्ताह २०२६’ पाळला जाणार आहे, यादरम्यान गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर होणारा संसर्ग टाळण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे.
मॅटर्नल सेप्सिस ही गर्भधारणा, प्रसूती, प्रसूतीनंतर किंवा गर्भपातानंतर होणाऱ्या संसर्गामुळे उद्भवणारी गंभीर अवस्था आहे. या अवस्थेत शरीराची संसर्गावरील प्रतिक्रिया अत्यंत तीव्र होते. मूत्रमार्गातील संसर्ग, दीर्घकाळ चाललेली प्रसूती, सिझेरियननंतर जखमेचा संसर्ग, प्रसूती पद्धतीमधील अस्वस्वच्छता किंवा गर्भाशयात राहिलेले ऊतक ही त्यामागील प्रमुख कारणे असू शकतात.
मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. केकीन गाला यांना सांगितलं की, वेळीच उपचार न केल्यास या समस्येमुळे अवयव निकामी होणं, अतिरक्तस्राव, शॉक बसणं, श्वास घेण्यास त्रास अशा गंभीर गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणूनच संसर्गाची लक्षणे दिसताच त्वरित वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे.
गर्भवती महिलांनी गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. नियमित हात धुणे, ताजे आणि स्वच्छ अन्नपदार्थांचे सेवन करणे, उकळून थंड केलेले पाणी पिणे तसेच संसर्ग झालेल्या व्यक्तींपासून दूर राहणे आवश्यक आहे. नियमित प्रसूतीपूर्व तपासण्या (अँटेनटल चेक-अप्स) केल्यास युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन, योनीमार्गातील संसर्ग, ताप किंवा रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणं यांसारख्या समस्या वेळीच ओळखता येतात आणि त्यावर वेळीच उपचार करता येतात.
प्रसूतीनंतर विशेषतः सिझेरियन किंवा एपिसिओटॉमी झालेल्या महिलांनी जखमेची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. जखमेची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी. ताप येणे, दुर्गंधीयुक्त स्त्राव, तीव्र पोटदुखी, टाक्यांभोवती लालसरपणा किंवा असामान्य अशक्तपणा जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही लक्षणांवर स्वतःहून उपचार करण्याचा प्रयत्न करू नका.
स्तनपान करताना स्वच्छता राखणे आणि स्तनांची योग्य काळजी घेणे हे देखील संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक आहे. प्रसूतीनंतर महिलांनी पौष्टिक आहाराचं सेवन करावं, पुरेशी विश्रांती घ्यावी, स्वताच्या मर्जीने औषधं घेणे टाळावे आणि आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यावी. महिलांनी आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्यात स्वतःची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.