
२०२५ चा स्वातंत्र्य दिन हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. १५ ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग १२ व्या वेळेस लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकवणार आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळालेल्या स्वातंत्र्याने भारताला ब्रिटिश राजवटीच्या दीर्घकालीन गुलामगिरीतून कायमचे मुक्त केले आणि या दिवसाने देशाला स्वतंत्र आणि सार्वभौम बनवले. हा दिवस केवळ उत्सवाचा नसून त्याग, संघर्ष आणि एकतेचे प्रतीक आहे.
लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करताना पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा विक्रम मोडला होता. मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात १० वेळा तिरंगा फडकवला होता. मोदींनी गेल्या स्वातंत्र्य दिनी ११ वेळा ध्वजारोहण केले आणि यावर्षी १२ व्या वेळेस तिरंगा फडकवून इतिहास घडवणार आहेत.
लाल किल्ल्यावरून सर्वाधिक वेळा तिरंगा फडकवणाऱ्यांच्या यादीत पहिले स्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात १७ वेळा हा सन्मान मिळवला. दुसऱ्या क्रमांकावर इंदिरा गांधी असून त्यांनी १६ वेळा लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ध्वजारोहण केले. पंतप्रधान मोदी यांची नावे आता या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर मनमोहन सिंग, पाचव्या क्रमांकावर अटलबिहारी वाजपेयी, सहाव्या क्रमांकावर पी. व्ही. नरसिंह राव आणि सातव्या क्रमांकावर राजीव गांधी यांचा समावेश आहे.
यंदाच्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरील पंतप्रधानांचे भाषण आणि तिरंगा फडकवण्याचा सोहळा देशभरातील नागरिकांसाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे. सरकारच्या आगामी योजनांचा आढावा, राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवरील भाष्य आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश यावेळी पुन्हा एकदा देशवासियांपर्यंत पोहोचणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.