

भारतात हार्ट अटॅक ही गंभीर आरोग्य समस्या बनतेय. देशात हार्ट अटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढत असून बदलती जीवनशैली, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव, वाढता ताण यामुळे हृदयाच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होतोय. 2014 ते 2019 या काळात भारतात हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये जवळपास 50 टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
शहरांमध्ये वाढणारे जीवनमान, बैठी जीवनशैली, फास्ट फूड आणि चुकीचा आहार यासोबतच मधुमेह आणि लठ्ठपणाचं वाढतं प्रमाणही हार्ट अटॅकला कारणीभूत ठरतं. त्यामुळे हार्ट अटॅकपासून बचाव करण्यासाठी त्याची कारणं, धोक्याची लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाय समजून घेणं गरजेचं आहे.
CMC वेल्लोरमध्ये प्रशिक्षण घेतलेले आणि अपोलो हॉस्पिटल्समधील फिजिशियन डॉ. सुधीर कुमार यांच्या मते, हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हार्ट फेल्युअरच्या जवळपास 99 टक्के घटनांमागे आधीपासून असलेले पण निदान न झालेले जोखमीचे घटक असतात. अनेकांना कोणतीही लक्षणं जाणवत नसल्यामुळे आपण पूर्णपणे फीट आहोत असं वाटतं. पण हृदयाशी संबंधित आजारांची सुरुवात अनेकदा अगदी शांतपणे होते.
पहिल्यांदा हार्ट अटॅक आलेल्या अनेक व्यक्तींमध्ये आधीपासून एक किंवा त्यापेक्षा जास्त आरोग्याच्या समस्या असतात. यातील चार महत्त्वाचे धोके पुढीलप्रमाणे आहेत.
रक्तदाब सतत वाढलेला राहिल्यास त्याचा रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. कालांतराने रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊ शकतं आणि त्यामध्ये चरबी जमा होण्याची शक्यता वाढते. यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDLचं प्रमाण जास्त असल्यास ते रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर जमा होऊ शकते. हळूहळू या ठिकाणी चरबीचे थर तयार होऊन रक्तवाहिन्या अरुंद होतात. त्यामुळे हृदयापर्यंत रक्त पोहोचण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.
मधुमेह किंवा प्री-डायबेटीस असल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. दीर्घकाळ रक्तातील साखर नियंत्रणात न राहिल्यास रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका आणखी वाढतो.
तंबाखू आणि सिगारेटचं सेवन हृदय तसंच रक्तवाहिन्यांसाठी अत्यंत घातक आहे. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं आणि हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे पूर्वी धूम्रपानाची सवय असलेल्या व्यक्तींनीही आपल्या हृदयाच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे.
हार्ट अटॅकचा धोका वाढवणारे अनेक घटक आपल्या नियंत्रणात असतात. आहार, व्यायाम, धूम्रपान आणि ताण यामध्ये योग्य बदल केल्यास तसेच गरजेनुसार डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी करता येऊ शकतो.
छातीत सतत किंवा वारंवार दुखणं
छातीतील वेदना हात, मान, जबडा किंवा पाठीपर्यंत जाणं
श्वास घेण्यास त्रास होणं किंवा धाप लागणं
मळमळ, उलटी किंवा अॅसिडिटीसारखी जळजळ होणं
चक्कर येणं किंवा बेशुद्ध पडणं
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.