Famous Actor Death: दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक ई. ए. राजेंद्रन यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. कोल्लम जिल्ह्यातील पट्टाथानम येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते वयोमानानुसार उद्भवणाऱ्या विविध आजारांवर उपचार घेत होते. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्रिशूर जिल्ह्यातील थ्रिट्टल्लूर हे त्यांचे मूळ गाव असून, त्यांच्या पश्चात पत्नी संध्या राजेंद्रन असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर २७ मार्च रोजी थ्रिट्टल्लूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ई. ए. राजेंद्रन यांचा अभिनयाचा प्रवास लहान वयातच सुरू झाला. शालेय जीवनात असतानाच त्यांनी नाटकांमध्ये सहभाग घेतला आणि रंगभूमीशी नाते जोडले. पुढे त्यांनी दिल्ली येथील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ (NSD) मधून अभिनयाचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यातील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (FTII) मधून दूरचित्रवाणी निर्मितीचे शिक्षण पूर्ण करत त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
राजेंद्रन यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे ६० चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. खलनायक आणि सहाय्यक भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला. व्ही. आर. गोपीनाथ दिग्दर्शित 'ग्रीष्मम' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर कालिअट्टम, प्रणयवर्णंगल, दया आणि पट्टाभिषेकम यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी दूरचित्रवाणी मालिकांमध्येही काम केले आणि रंगभूमी दिग्दर्शक म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली. काही काळ कामाच्या संधी कमी झाल्यानंतरही त्यांनी जिद्दीने कमबॅक केला. राजेंद्रन यांनी ‘राज्य फलोत्पादन महामंडळा’चे अध्यक्ष म्हणूनही काम केले. तसेच ते अभिनेते मुकेश यांचे मेहुणे होते. त्यांच्या जाण्याने एक बहुआयामी कलाकार हरपला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.