
संजय राठोड, साम टिव्ही
यवतमाळ : वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न उराशी बाळगून मेहनतीने तयारी करत असलेल्या एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने नीट (NEET)चा पेपर चुकल्याच्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. लकी सुनिल चव्हाण (वय १९, रा. महेशनगर, दिग्रस,यवतमाळ) असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण दिग्रस शहरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा आणि स्पर्धेचा वाढता ताण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.
नीट (राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा) ही देशभरातील सर्वसामान्य वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी घेतली जाणारी अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांनी एक वर्ष वा त्याहून अधिक काळ कठोर परिश्रम घेतले. रविवारी, ५ मे रोजी ही परीक्षा पार पडली. यवतमाळ जिल्ह्यातून एकूण २,८५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. लकी चव्हाण हाही याच विद्यार्थ्यांपैकी एक होता. त्याने ही परीक्षा दिली होती. परीक्षेनंतर घरी परतल्यानंतर त्याच्या मनात पेपर बरोबर न गेल्याची चिंता त्याला स्वस्त बसू देत नव्हती, त्यामुळे तो नैराश्यात आला होता. मात्र तो सतत चिंतेत आणि गप्प राहू लागला. राहत्या घरी लकीने घराच्या स्लॅबला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
कुटुंबीयांना ही घटना समजली आणि त्यांनी तातडीने त्याला दिग्रस ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच दिग्रस पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. लकी चव्हाण हा शांत, अभ्यासू आणि स्वप्नाळू स्वभावाचा मुलगा होता, अशी माहिती मित्रपरिवाराकडून मिळत आहे. त्याचे वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचं स्वप्न होतं. मात्र, एका परीक्षेच्या ताणाने त्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
'मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका'
ही घटना केवळ लकीच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी डोळे उघडणारी ठरणारी आहे. स्पर्धा परीक्षा, विशेषतः NEET, JEE यांसारख्या परीक्षा विद्यार्थ्यांवर अपार मानसिक ताण टाकतात. अशा वेळी पालक, शिक्षक आणि समाजाने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे. एक परीक्षेतील अपयश हे आयुष्याचं अपयश नाही, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.
'शेवटी मार्गदर्शन, संवाद आणि मानसिक आधार यांची गरज'
लकीच्या दुर्दैवी आत्महत्येने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे की, केवळ शिक्षण नव्हे तर विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजा ओळखून त्यांना योग्य वेळी समुपदेशन आणि प्रेमाची गरज आहे. पालकांनी आपल्या मुलांशी खुल्या मनाने संवाद साधावा, त्यांच्या मनातील भीती समजून घ्यावी आणि गरज वाटल्यास तज्ञ समुपदेशकांची मदत घ्यावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.