
पुण्यातील वैष्णवी हगवणे या तरुणीने हुंड्यासाठी सासरच्यांनी केलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना ताजी असतानाच राज्यात एकापाठोपाठ एक हुंडाबळीच्या घटना समोर येत आहेत. पुण्यानंतर नाशिक आणि आता अमरावतीमध्ये एका विवाहितीने हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. याप्रकरणी महिलेच्या नवऱ्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नात कमी आंधण दिल्यामुळे सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला. या जाचाला कंटाळून विवाहितेने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अमरावतीच्या वरुड तालुक्यातील आमनेर येथे घडली. मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पती,दिरासह एका महिलेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावती पोलिसांनी याप्रकरणी अब्दुल फइम अब्दुल रहीम, अब्दुल नदिम अब्दुल रहीम आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना काही तासांत अटक केली. नागपूरमध्ये राहणाऱ्या अकबर खान यांच्या मुलीचे २०२२ मध्ये अमरावतीमध्ये राहणाऱ्या अब्दुल फईम अब्दुल रहिम याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर सगळं काही सुरळीत सुरू होते. पण काही महिन्यांनंतर अकबर खान यांच्या मुलीचा सासरच्यांकडून छळ सुरू झाला.
लग्नामध्ये अंदाण कमी दिल्यामुळे तिचा छळ केला जात होता. नवरा, सासू आणि दिराकडून या विवाहितेला वारंवार मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून विवाहितीने गळफास लावून आत्महत्या केली. मुलीने आत्महत्या केल्याचे कळताच अकबर खान यांना मोठा धक्का बसला. त्यांनी वरूड पोलिस ठाण्यात धाव घेत मुलीच्या सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.