
सामान्य लोकांचा करवाटा कंपन्यांपेक्षा जास्त झाला आहे.
२०२४ मध्ये वैयक्तिक उत्पन्न कराचा वाटा ५३% आहे.
टॅक्स भरणाऱ्यांची संख्या ३ कोटीवरून १० कोटींवर गेली.
भारतामध्ये पहिल्यांदाच असं झालंय की, सामान्य लोकांकडून घेतला जाणारा व्यक्तिगत उत्पन्न कर (पर्सनल इनकम टॅक्स) हा कंपन्यांकडून मिळणाऱ्या कॉर्पोरेट टॅक्सपेक्षा जास्त झाला आहे. म्हणजेच आता कर भरण्यात सर्वसामान्य लोकांचा वाटा कंपन्यांपेक्षा मोठा आहे. हा बदल हे दर्शवतो की, देशात करव्यवस्था जलद गतीने बदलतेय. याशिवाय लोक आधीपेक्षा अधिक प्रामाणिकपणे कर भरत आहेत.
JM Financial Institutional Securities च्या अहवालानुसार, 2014 साली पर्सनल इन्कम टॅक्सचा वाटा एकूण डायरेक्ट टॅक्स कलेक्शनमध्ये 38% होता. 2024 मध्ये तो वाढून 53% पेक्षा जास्त झाला आहे. उलट कॉर्पोरेट टॅक्सचा वाटा 62% वरून घटून 46% इतका झाला आहे. म्हणजे आता कर वसुलीत कंपन्यांपेक्षा जास्त योगदान सामान्य लोकांचं आहे.
गेल्या दहा वर्षांत टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. 2014 मध्ये साधारण 3 कोटी लोक रिटर्न भरत होते, 2023 मध्ये ही संख्या 7 कोटींवर पोहोचली. जर त्यात रिटर्न न भरता थेट कर भरून टाकणाऱ्या लोकांचा समावेश केला. तर एकूण करदाते 10 कोटींच्या आसपास येतात. म्हणजे आता जास्तीत जास्त लोक टॅक्स नेटमध्ये आले आहेत.
सरकारने करप्रणाली डिजिटल केली आणि वसुली सोपी केली. त्यामुळे TDS (Tax Deduction at Source) आणि अॅडव्हान्स टॅक्स यात प्रचंड वाढ झाली.
2014 मध्ये TDS वसुली 2.5 लाख कोटी होती, जी 2024 मध्ये 6.5 लाख कोटी झाली.
अॅडव्हान्स टॅक्स वसुली 2.9 लाख कोटीवरून 12.8 लाख कोटींवर गेली.
या दोन्हींचा वाटा मिळून एकूण डायरेक्ट टॅक्स कलेक्शनच्या निम्म्याहून जास्त आहे.
2017 मध्ये लागू झालेल्या GST मुळे करव्यवस्था अधिक मजबूत झाली. छोटे-मोठे व्यवसाय डिजिटल पद्धतीने जोडले गेले आणि टॅक्स चोरीला मोठ्या प्रमाणात आळा बसला. 2019 मध्ये GST करदात्यांची संख्या 1.24 कोटी होती, जी 2024 मध्ये 1.47 कोटींवर गेली.
इनकम टॅक्स वाढण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे पगारात झालेली वाढ. 2014 मध्ये देशातील एकूण पगार 9.8 लाख कोटी होता. तर २ वर्षांपूर्वी म्हणजे 2023 मध्ये तो वाढून 35.2 लाख कोटी झाल्याची नोंद आहे. पगार वाढल्यावर टॅक्स कलेक्शन आपोआप वाढतं. त्यामुळे पर्सनल इन्कम टॅक्स 2014 मध्ये 2.4 लाख कोटीवरून 2023 मध्ये 8.3 लाख कोटींवर पोहोचला.
2001 मध्ये भारताचा डायरेक्ट टॅक्स टू GDP रेशो 3.2% होता, जो 2024 मध्ये वाढून 6.6% झाला आहे. असं असलं तरीही भारताचा टॅक्स बेस अजूनही तुलनेने लहान आहे. भारतात फक्त 7% लोकसंख्या कर भरते तर विकसित देशांमध्ये हा आकडा जवळपास 50% पर्यंत असल्याची माहिती आहे.
भारतामध्ये पर्सनल इन्कम टॅक्सने कॉर्पोरेट टॅक्सला मागे टाकणं हा मोठा बदल आहे. याचा अर्थ, देशातील सामान्य लोकं करप्रणालीत अधिक मोठी भूमिका बजावत आहेत. डिजिटायझेशन, GST आणि कडक नियम यामुळे हा बदल घडून आला आहे. येत्या काळात करदात्यांचा आधार आणखी वाढू शकतो आणि त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
वैयक्तिक उत्पन्न कराचा वाटा २०२४ मध्ये किती आहे?
२०२४ मध्ये वैयक्तिक उत्पन्न कराचा वाटा ५३% पेक्षा जास्त आहे.
कॉर्पोरेट कराचा वाटा २०१४ ते २०२४ मध्ये किती घटला?
कॉर्पोरेट कराचा वाटा ६२% वरून घटून ४६% झाला आहे.
टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांची संख्या २०१४ ते २०२३ मध्ये किती वाढली?
टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांची संख्या ३ कोटीवरून ७ कोटींवर गेली.
GST च्या सुरुवातीपासून करदात्यांची संख्या किती वाढली?
GST नंतर करदात्यांची संख्या १.२४ कोटीवरून १.४७ कोटींवर गेली.
भारतात किती टक्के लोक कर भरतात?
भारतात फक्त ७ टक्के लोकसंख्या कर भरते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.