सातारा : कोयना धरणात पाण्याची आवक वाढली. उद्या दुपारी 4 वाजता विसर्ग दुप्पट करणार. सध्या 1050 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू. उद्यापासून 2100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार. कोयना, कृष्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सायन - पनवेल महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून, वाहतूककोंडीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. याविरोधात मनसे आक्रमक झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील ७ दिवसात सायन-पनवेल महामार्गावरील सर्व खड्डे दुरुस्त करण्याचे लेखी आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला दिले. येत्या ७ दिवसांत सायन-पनवेल महामार्गावरील सर्व खड्डे न बुजावल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला.
अंबरनाथच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण ओव्हरफ्लो झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. गेल्या आठवड्यापासून पडणाऱ्या पावसाने धरण क्षेत्रात दमदार हजेरी लावली असून चिखलोली धरण ओव्हर फ्लो झालं आहे. मागील वर्षी १३ जुलैला धरण ओव्हरफ्लो झाले होते. या धरणातून अंबरनाथ पूर्व भागात शिवाजीनगर, वडवली, महालक्ष्मीनगर आदी परिसराला चिखलोली धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहरातील इतर भागात बदलापूरच्या बॅरेज धरणातून पाणीपुरवठा केला जातो.
मुंबईमध्ये जुलैच्या मध्यानंतर दमदार पावसाला सुरूवात झाली. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात देखील पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे आता मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्या 7 तलावांपैकी 3 तलाव ओसंडून वाहायला देखील सुरूवात झाली आहे. मध्यरात्री विहार तलाव ओव्हर फ्लो झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली 10 टक्के पाणीकपातीचा निर्णय रद्द होईल, अशी मुंबईकर नागरिकांना अपेक्षा आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणार २५६८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग
सकाळी ११ वाजता पाण्याचा विसर्ग कमी करून १७१२ क्यूसेक पाणी सोडले.
पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी/जास्त होण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी सतर्क राहावे, जिल्हा प्रशासनाचे आवाहन
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक तानसा धरण हे बुधवारी रात्रीच्या सुमारास भरले आहेत. धरण ओव्हर फ्लो झाल्याने ४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून ४४०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे वारणा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून धरणातील पाणीसाठी ८० टक्के इतका झाला आहे.
दरम्यान, धरण भरण्याची शक्यता असल्याने धरणातून आज सकाळी ११ वाजता पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहेत. पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून राधानगरी धरण १०० टक्के भरलं आहे. त्यामुळे आज सकाळीच धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
कोल्हापूरकरांनी महापूराचा धसका घेतला आहे. पुराच्या भीतीने नागरिकांनी शेकडो वाहने रस्त्यावर लावली आहे. वाहने बुडून खराब होऊ नये, अशी भीती नागरिकांना वाटते आहे. याच भीतीपोटी महावीर कॉलेज ते रमनमाळा या मार्गावर आपली चारचाकी वाहने लावली आहेत.
दरम्यान, राधानगरी धरणाचे ६ दरवाजे खुले करण्यात आल्यानंतर परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. २०१९ सारखी पूरस्थिती निर्माण तर होणार नाही ना? याची भीती सध्या कोल्हापूरकरांना वाटत आहे.
गेल्या आठवडाभरापासून भीमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भीमा नदीवरील चास कमान जलाशय ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. भोरगिरी परिसरात पाऊसाचा जोर वाढल्याने चास-कमान धरणात पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे.
यापूर्वी कळमोडी धरण ओव्हरफ्लो होऊन चास कमान धरणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खेड व शिरुर तालुक्याला शेती व पिण्याच्या पाण्याचे वरदान ठरलेल्या या जलाशयामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.