चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भूमिका स्पष्ट केली.
ओबीसी समाजाचा हक्क अबाधित राहील, याची सरकारकडून खात्री देण्यात आली.
उच्च न्यायालयाने कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आदेश दिले असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
एका ताटातलं काढून दुसऱ्या ताटात देणे योग्य नाही, असा टोला त्यांनी लगावला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पुणे येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उच्च न्यायालयाने या प्रश्नाची दखल घेतली असून कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी आदेश दिले असावेत, असे ते म्हणाले.
बावनकुळे म्हणाले, आम्ही भाजप म्हणून सुरुवातीपासूनच मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. फडणवीस सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षणाद्वारे मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला. याचा थेट फायदा समाजाला झाला. मात्र एका ताटातलं काढून दुसऱ्या ताटात टाकणे, हे राज्याला किंवा कोणालाच शोभणारे नाही.
ते पुढे म्हणाले की, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, याची पूर्ण काळजी सरकार घेत आहे. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना आरक्षण देण्यासाठी अभ्यास आवश्यक आहे. त्यासाठी उपसमिती काम करत आहे. हा प्रश्न चर्चा करूनच सोडवला जाईल, असे बावनकुळे म्हणाले.
सरकारने आंदोलकांना परवानगी दिली असून चिरडण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमच्या सरकारने जे दिलं ते आतापर्यंत कोणीच दिलं नाही. सर्व घटकांना आमचे सरकार न्याय देणार आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.