रोहित शर्मा, विराट कोहली निवृत्त होणार?
क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण
ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका अखेरची असणार?
पॅट कमिंसच्या वक्तव्याने उडाली खळबळ
रोहित शर्माकडून भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद काढून घेतलं आणि ते शुभमन गिलकडं दिलं. त्यामुळं अजित आगरकर, गौतम गंभीर हे दोघे क्रिकेट आणि रोहित शर्माच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आले. अगदी भारताच्या महान क्रिकेटपटूंकडूनही या दोघांवर टीका झाली. कसोटी, टी २० आणि आता वनडेतूनही रोहित शर्मा, विराट कोहली निवृत्त होणार असे अंदाज बांधले जाऊ लागले. पुढची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा हे दोघेही खेळणार नाहीत, असेही बोलले जाऊ लागले. आता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंस यानंही या दोघांच्या भविष्याबाबत वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळणार आहेत. या मालिकेला सुरुवात होण्याआधीच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंस यानं या दोघांच्या क्रिकेटच्या भवितव्याबाबत भाष्य केलं आहे. पर्थमध्ये रविवारपासून सुरू होणारी एकदिवसीय मालिका खास आहे. कारण ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट चाहत्यांसाठी सुपरस्टार असलेला विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची झलक पाहण्याची कदाचित अखेरची संधी असेल, असे कमिंस म्हणाला.
विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही १५ वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघात खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांसाठी हे दोघेही सुपरस्टार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मैदानात या दोघांना खेळताना बघण्याची क्रिकेटप्रेमींसाठी अखेरची संधी असू शकते, असं कमिंस म्हणाला.
कमिंस नाराज
भारताविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत पॅट कमिंस खेळणार नाही. त्यामुळं त्याचं मन खट्टू झालं आहे. भारताविरुद्ध एकदिवसीय आणि टी २० मालिका न खेळणं माझ्यासाठी निराशाजनक आहे. मला वाटतंय की प्रेक्षकांची तुफान गर्दी या मालिकेला होईल. ऑस्ट्रेलियामध्ये आधीपासूनच या मालिकेबद्दल कमालीची उत्सुकता आहे. म्हणूनच या मालिकेत न खेळणं निराशाजनक आहे, असं पॅट कमिंस म्हणाला.
पॅट कमिंस या मालिकेत खेळणार नाही. भारतीय फलंदाज जबरदस्त फॉर्मात आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची बॅट ऑस्ट्रेलियात खेळताना तळपते. ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय सामने खेळताना या दोघांची धावांची सरासरी ५० टक्क्यांहून अधिक आहे.
पॅट कमिंस वनडे मालिकेत खेळणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचं नेतृत्व मिचेल मार्श करणार आहे. ही मालिका सुरू होण्याआधी कमिंसने मार्शला महत्वाचा सल्ला दिला आहे. ऑस्ट्रेलियाला तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकायचीच आहे, पण आपल्याला युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी द्यायची आहे, ही बाब सुद्धा लक्षात घ्यावी. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत जे खेळले नाहीत, त्यांना संधी द्यायची आहे, असं कमिंस म्हणाला.
युवा खेळाडूंसोबत खेळणे हे आपले लक्ष्य असणार आहे. ते काय करू शकतात हे बघायचं आहे. २०२७ च्या विश्वचषकापर्यंत आपले कोणते १५ खेळाडू या स्पर्धेत खेळू शकतात हे आपल्याला माहीत असलं पाहिजे, असंही कमिंस म्हणाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.